लाल किल्ल्यातील मशिदीच्या पायर्‍यांखाली गाडले आहेत श्रीकृष्ण मंदिरातील प्राचीन मूर्ती !

श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठीचा खटला

पुरातत्व विभागाने मूर्ती बाहेर काढाव्यात ! – श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती आंदोलन समितीची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतः याची नोंद घेऊन हिंदूंचा गाडलेला गौरवशाली वारसा पुन्हा मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील न्यायालयात श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणी खटला चालू आहे. याच्या सुनावणीच्या वेळी श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष अधिवक्ता महेंद्रप्रताप सिंह यांनी सांगितले की, मथुरेमधील कटरा केशवदेव परिसरातील  ओरछा नरेश वीरसिंह बुंदेला यांनी उभारलेल्या ठाकुर केशवदेव (भगवान श्रीकृष्ण) यांच्या भव्य मंदिरातील ‘श्रीविग्रहां’ना (मूर्तींना) आगरा येथील लाल किल्ल्यातील दीवाने-ए-खासमधील लहान मशिदीच्या पायर्‍यांखाली गाडण्यात आले आहे. हे श्रीविग्रह तेथून काढण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावर १९ एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.

अधिवक्ता सिंह यांनी न्यायालयाला सांगितले की, सध्या कटरा केशवदेव टीला येथे बांधण्यात आलेले भगवान केशवदेव मंदिर आणि भागवत भवन येथे वर्ष १६१८ मध्ये  जहांगीर बादशहाच्या काळात ओरछा नरेश यांनी अत्यंत विशाल मंदिर उभारले होते. हे मंदिर वर्ष १६६९ मध्ये औरंगजेब याने पाडले आणि त्यातील अवशेषांद्वारे ईदगाह मशीद बांधली. या वेळी मंदिरातील भगवान केशवदेव यांच्या ‘श्रीविग्रहां’ना आगरा येथील लाल किल्ल्याच्या दीवाने-ए-खासमधील लहान मशिदीच्या पायर्‍यांखाली गाडले. यामुळे आजही कोट्यवधी भाविक दुखावले आहेत. त्यामुळे पुरातत्व विभाग अथवा अन्य तज्ञांनी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘श्रीविग्रहां’ना तेथून बाहेर काढावे आणि संरक्षणात ठेवावे, अशी मागणी केली.