कृषी विधेयकाला होणारा विरोध आणि त्याच्या विरोधातील अफवा चुकीच्या ! – खासदार नारायण राणे, भाजप

खासदार नारायण राणे

कुडाळ – देशातील उत्पादित मालाला दुप्पट भाव मिळावा, तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक संमत केले आहे. त्यामुळे त्याला होणारा विरोध चुकीचा आहे. या कायद्याच्या विरोधात पसरवल्या जाणार्‍या अफवा आणि केली जाणारी अपकीर्ती चुकीची आहे. यापूर्वी ७० वर्षे या देशावर राज्य करणार्‍या सरकारने शेतकर्‍यांना अंधारात ठेवण्याचे पाप केले. संसदेत आणि रस्त्यावर जी आंदोलने केली जात आहेत, त्याला जनता योग्य उत्तर देईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई आदी उपस्थित होते.

या वेळी खासदार राणे म्हणाले, ‘‘या विधेयकामुळे दलालांद्वारे माल विकला जाणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अधिक लाभ होणार आहे. शेतकर्‍याला त्याच्या मालाची रक्कम तीन दिवसांत मिळण्याची हमी या कायद्याने मिळणार आहे. ‘शेतकर्‍याच्या मालाला मिळत असलेली आधारभूत किंमत बंद होणार’, असे सांगून विधेयकाला चालू असलेला विरोध चुकीचा आहे; मात्र तसे होणार नसून सरकारच्या वतीने केली जाणारी मालाची खरेदी चालूच रहाणार आहे. शेतात पिकवलेला माल कुठेही विकण्याचे पूर्ण स्वातंत्र्य या विधेयकामुळे शेतकर्‍यांना दिले जाणार आहे.’’