पतीनिधनानंतर नैराश्य आल्यावर सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यानंतर जीवनाला मिळालेली कलाटणी आणि रामनाथी आश्रमात आल्यानंतर आलेली भावजागृतीची अनुभूती

१. पतीनिधनानंतर नैराश्य येऊन मनात अनावश्यक विचार येणे : पतीनिधनानंतर ‘माझे आयुष्य उघड्यावर पडले आहे’, असे मला वाटत होते. माझ्यावर २ मुलांचे आणि सासू-सासर्‍यांचे दायित्व होते. त्यामुळे माझ्या मनात नैराश्याचे विचार येऊन ‘कुठेतरी जावे’, असे मला वाटत होते.

२. सनातन संस्थेच्या सत्संगात जायला लागल्यावर ‘मनावरील ताण न्यून होत आहे आणि आयुष्याला कलाटणी मिळत आहे’, असे लक्षात येणे : त्याच वेळी आमच्या वाडीत सनातन संस्थेच्या वतीने सत्संग होऊ लागला. मी त्या सत्संगाला जाऊ लागले. त्या सत्संगात प्रार्थना, कृतज्ञता आणि स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन यांसंदर्भात मार्गदर्शन केले जात होते. त्यामुळे ‘माझ्या मनावरील ताण न्यून होत आहे आणि सत्संगातील भावजागृतीमुळे माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळत आहे’, असे माझ्या लक्षात येऊ लागले होते. मी मिळेल त्या वेळेत नामस्मरण, स्वयंसूचना देणे आणि सेवा करणे, यांवर भर देत होते. माझ्याकडून परमेश्‍वराला सातत्याने प्रार्थना होत असे, ‘हे परमेश्‍वरा, माझ्या आयुष्याचे सार्थक तुझ्याच सेवेत आहे, तरी माझ्याकडून भावपूर्ण सेवा करवून घे.’

३. गुरुदेवांच्या कृपेनेे रामनाथी आश्रमात येण्याची इच्छा पूर्ण होणे : मला रामनाथी आश्रमात येण्याची पुष्कळ इच्छा होती. २९.४.२०१८ या दिवशी गुरुदेवांच्या कृपेमुळे ती इच्छा पूर्ण झाली.

४. रामनाथी आश्रमदर्शनामुळे झालेली भावजागृती

अ. मी रामनाथी आश्रमात प्रवेश करत असतांना स्वागतकक्षाच्या बाहेरील लादीवर ‘पाण्याच्या लाटांसारखी वलये निर्माण होत आहेत’, असे मला वाटत होते आणि आश्रमदर्शनाच्या वेळी ताईने याविषयी सांगितल्यावर ‘मला आलेली ही पहिली अनुभूती आहे’, हे लक्षात आले.

आ. आश्रमात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला श्रीकृष्णाचे चित्र आणि उजव्या बाजूला प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आहे. ती छायाचित्रे पाहून ‘मी ईश्‍वराच्या सान्निध्यात स्वर्गात आले आहे’, असा भाव माझ्या मनात निर्माण झाला होता. त्या वेळी मी ईश्‍वराला शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करत होते आणि ‘हे परमेश्‍वरा, तू माझ्या आयुष्याचे येथे येऊन सार्थक केले आहेस’, असे म्हणत होते.

इ. ध्यानमंदिरात मला पुष्कळ सात्त्विकता जाणवली आणि तेथे बसलेले साधक ‘ध्यानाला किंवा नामजपाला बसलेले साधू-संतच आहेत’, असे वाटून माझ्या मनात भाव निर्माण होत होता.

ई. आश्रमातून बाहेर आल्यावर माझे लक्ष सतत आश्रमाकडे जात होते आणि मी संपूर्ण आश्रम माझ्या डोळ्यांत साठवून ठेवत होते. ‘आश्रमाच्या बाहेर ‘परात्पर गुरुदेव श्रीकृष्णाच्या रूपात उभे आहेत’, असे मला दिसत होते.

उ. आश्रमदर्शनानंतर माझी भावजागृती होत होती. आश्रमदर्शनाने मन एकाग्र होऊन परमेश्‍वराच्या नामस्मरणात गुंतले आहे, असे जाणवत होते.’

– श्रीमती प्रियांका दीपक वारीक, मु.पो.गिर्ये, पडेल, सिंधुदुर्ग. (१३.५.२०१८)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक