Acharya Mahamandaleshwar Kailashanand Giriji Maharaj : सर्व संतांनी शासनाकडे हिंदु राष्ट्राची मागणी करावी !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

आखाड्यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच ! – आचार्य महामंडलेश्‍वर कैलाशानंद गिरिजी महाराज, पीठाधीश्‍वर श्री पंचायती आखाडा निरंजनी

श्री. नीलेश कुलकर्णी आणि श्री. किशोर जगताप, प्रयागराज

आचार्य महामंडलेश्‍वर कैलाशानंद गिरिजी महाराज

प्रयागराज, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – सर्व संतांच्या सहमतीने एक निवेदन केंद्र आणि राज्य शासन यांना देऊन त्याद्वारे देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करावी, असे महत्त्वपूर्ण विधान आचार्य महामंडलेश्‍वर कैलाशानंद पुरीजी यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केले. याकरिता आखाडयांच्या माध्यमातून जे काही करणे शक्य असेल, ते सर्व काही करू, असेही ते म्हणाले. यासह त्यांनी गोमातेला राष्ट्रमाता घोषित करावे, अशीही मागणी करत ‘सनातन बोर्ड बनले, तर हिंदूंना लाभच होईल’, असेही सांगितले.

हिंदु राष्ट्राची घोषणा लवकरच होईल ! – श्रीमहंत रवींद्रपुरीजी महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय आखाडा परिषद  

श्रीमहंत रवींद्रपुरीजी महाराज

प्रयागराज येथील भव्य महाकुंभ, अयोध्येतील श्रीराम मंदिर, वाराणसीतील श्री काशी विश्‍वेश्‍वर मंदिर आणि उज्जैन येथील श्री महाकालेश्‍वर मंदिर यांकडे पाहिले, तर असे लक्षात येते की, हे सर्व पालट हिंदु राष्ट्राचेच संकेत देत आहेत. त्याच दिशेने मार्गक्रमण चालू असून लवकरच हिंदु राष्ट्राचे घोषणा होईल, असे आम्हाला वाटते. महाकुंभपर्वात संतांकडून ‘सनातन बोर्ड’च्या होणार्‍या मागणीविषयी बोलतांना ते म्हणाले की, सनातन बोर्ड हा महत्त्वाचा विषय असल्याने त्याविषयी घाईघाईत निर्णय करण्याऐवजी सर्व संतांच्या सहमतीने चर्चेतून  निर्णय घेण्यात येईल.