बांगलादेशातील हिंदु आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

नागपूर येथे आंदोलनातील मागणी !

उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदु संघटनांचे पदाधिकारी आणि धर्मप्रेमी

नागपूर, १४ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदु आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी नुकतेच हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदु संघटनांच्या वतीने आंदोलन पार पडले. यासह महाराष्ट्र राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लवकरात लवकर पारित करण्यात यावा, या मागणीचे निवेदन माननीय उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या !

१. बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे, घरांची लूट, मंदिरांवरील आक्रमणे, मूर्तींची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्यदलाला कठोर सूचना द्याव्यात.

२. पीडित हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हालवून त्यांना सुरक्षा पुरवावी.

३. आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता यांची जी हानी झाली असेल, त्याची तातडीने भरपाई करावी.

४. बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदू विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’द्वारे भारत सरकारने आश्रय द्यावा.

५. ५ कोटी बांगलादेशी घुसखोर याआधी भारतात शिरले आहेत. आता पुन्हा ही घुसखोरी वाढण्याची शक्यता पहाता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा.

या वेळी लोक जागृती मोर्चाचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. रमण सेनाड, चित्पावन ब्राह्मण महासंघाचे सचिव श्री. उमाकांत रानडे, मंदिर विश्वस्त श्री. दिलीप कुकडे, श्री. महादेवराव दमाहे, पुजारी श्री. प्रदीप पांडे, श्री. भुरे गुरुजी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेनला आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.