रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’त साधिकांना आलेल्या अनुभूती !

१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’त साधिकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्रीमती मधुरा तोफखाने (वय ५७ वर्षे), सांगली

श्रीमती मधुरा तोफखाने

१ अ. शिबिरात मार्गदर्शन चालू असतांना अचानक पांढर्‍या रंगाचे पुष्कळ गोळे व्यासपिठावरून खाली उतरतांना दिसणे : २१.१.२०२४ या दिवशी शिबिरात सकाळी ११ वाजता मार्गदर्शन चालू असतांना अचानक पांढर्‍या रंगाचे पुष्कळ गोळे व्यासपिठावरून खाली उतरतांना दिसले. चमकणार्‍या चांदण्याप्रमाणे ते दृश्य दिसत होते. ते गोळे प्रत्येक साधकाच्या हृदयात जातांना दिसले. त्यानंतर सभागृहात पुष्कळ सकारात्मक ऊर्जा जाणवत होती.

१ आ. प्रत्येक सत्रामध्ये अनेक साधकांची भावजागृती होत होती.

१ इ. चैतन्य आणि भाव या स्तरांवर या शिबिराची अनुभूती घेता आली.

गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. सौ. मनीषा कावरे, शहर आणि जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र

सौ. मनीषा कावरे

२ अ. आश्रमात सगळीकडे सूक्ष्म सुगंध येणे : आश्रमात आल्यावर मला सगळीकडे सूक्ष्म सुगंध येत होता. आश्रम पहात असतांना सगळीकडे तुळशीच्या मंजिर्‍यांचा सुंदर सुगंध येत होता. तेव्हा ‘श्रीकृष्ण सतत माझ्यासोबतच आहे’, असे मला वाटत होते. त्यासाठी माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.

२ आ. श्री गणेशाला भावपूर्ण प्रार्थना केल्यावर साधिकेला श्री गणेश बुद्धीमध्ये विराजमान झाल्याचे जाणवणे : श्री गणेशमूर्तीचे दर्शन घेतांना ‘शिबिरातील ज्ञान ग्रहण करण्याची माझी क्षमता नाही. तूच आज दिवसभर माझ्या बुद्धीमध्ये विराजमान हो. माझ्या साधनेतील सर्व अडथळे दूर कर’, अशी श्री गणेशाच्या चरणी आर्ततेने आणि भावपूर्ण प्रार्थना झाली. तेव्हा ‘श्री गणेश साक्षात् माझ्या बुद्धीमध्ये विराजमान झाला आहे’, असे मला वाटत होते.

२ इ. शिबिरातील सूत्रे शिकतांना पुष्कळ आनंद मिळाला.’

३. सौ. मीनाक्षी कोल्हे (वय ५७ वर्षे), नाशिक.

सौ. मीनाक्षी कोल्हे

३ अ. भावजागृतीच्या प्रयोगाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यात साधक न्हाऊन निघत असल्याचे जाणवणे : ‘शिबिरातील दुसर्‍या दिवशी भावजागृतीच्या प्रयोगाच्या वेळी ‘साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आमच्या समोर बसले आहेत. सर्व साधक त्यांच्या चरणांजवळ बसले आहेत. गुरुमाऊलींच्या हृदयातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे आणि सर्व साधकांवरील अनिष्ट शक्तींचे आवरण दूर होत आहे. सर्व साधक त्या चैतन्यात न्हाऊन निघत आहेत’, असे मला जाणवले.

३ आ. ध्यानमंदिरात आरतीच्या वेळी देवतांचे अस्तित्व जाणवणे : मी ध्यानमंदिरात आरतीच्या वेळी गेले होते. तेथे ३ वेळा शंखनाद झाल्यावर ‘सर्व देवता लगबगीने आश्रमाच्या दिशेने निघाल्या आणि काही सेकंदांतच ध्यानमंदिरात त्या त्या ठिकाणी विराजमान झाल्या. त्या सर्वांना आशीर्वाद द्यायला सज्ज झाल्या. आरती संपल्यावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली’, असे मला जाणवले.

३ इ. शिबिरात माझी पुष्कळ भावजागृती झाली.’

४. सौ. निलिमा चंद्रशेखर असलेकर, चिंचवड, पुणे.

सौ. निलिमा असलेकर

४ अ. साधिकेला शिबिरामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्वतः मार्गदर्शन करत असल्याचे जाणवणे : मला शिबिरामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व सतत जाणवत होते. तसेच ‘ते आसंदीवर बसले आहेत आणि तेच सर्व साधकांना सूत्रे सांगत आहेत’, असे मला जाणवत होते.

४ आ. शिबिरातील तिन्ही दिवस माझ्या मनाला सतत उत्साह वाटत होता.

४ इ. या शिबिरामुळे मला आश्रमातील चैतन्य अनुभवता आले.

४ ई. शिबिराच्या कालावधीत सूत्रे लिहितांना सर्व हस्ताक्षर एकसारखे येणे : गुरुदेवांच्या कृपेने माझे अक्षर चांगले आहे. इतर वेळी मी पुष्कळ लिहिले किंवा कंटाळा आल्यावर लिहिले, तर माझे अक्षर वेडेवाकडे येते; परंतु शिबिराच्या ३ दिवसांत माझ्याकडून जे काही लिहिले गेले, ते अगदी एकसारखे लिहिले गेले.’

५. सौ. शर्मिला निमकर, कोथरूड, पुणे.

सौ. शर्मिला निमकर

५ अ. ध्यानमंदिरात पूजा चालू असतांना भाव जागृत होणे : २०.१.२०२४ या दिवशी ध्यानमंदिरामध्ये सकाळी नित्य पूजेच्या वेळी मी नामजप करण्यासाठी बसले होते. साधकपुरोहित पूजा करत असतांना माझा भाव जागृत झाला.

५ आ. आरतीच्या वेळी शरिराला हलकेपणा आल्याचे जाणवणे : आरती चालू झाल्यावर मी डोळे बंद करून आरती म्हणत होते. तेव्हा ‘मी हवेत तरंगत आहे. माझ्याभोवती काहीही नाही. मी वर वर जात आहे. माझ्या शरिरामध्ये पुष्कळ हलकेपणा आहे’, असे मला जाणवले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २१.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक