सध्याच्या काळात आरोग्य कसे सांभाळणार ?

पालटत्या युगातील आजार उत्पन्न करणार्‍या नवीन कारणांना तोंड देत असतांना सगळ्यांमध्ये एक साधारण गोष्ट दिसते, ती म्हणजे प्रतिदिन या ना त्या स्वरूपात आपल्या पोटात जात असणारी विषे. ही विषे फळे आणि भाज्या यांतून जाणारी खते, आम्लधर्मी वायु आणि रसायनांमुळे प्रतिदिन शरिरात घेतली जाणारे हवा आणि पाणी, पिशवीबंद (पॅक) केलेल्या अन्नामध्ये ‘शेल्फ लाईफ’ (एखादा पदार्थ वापरण्यायोग्य स्थितीत रहाण्यासाठीचा कालावधी) वाढावे म्हणून घातलेले ‘प्रिझर्व्हेटिव्हस्’ (पदार्थ खराब होऊ नये म्हणून यासाठी त्यात घालण्यात येणारा पदार्थ), वेळच्या वेळी जेवण न केल्याने, व्यायाम नसतांना वेळी अवेळी पुष्कळ खाल्ले गेलेले शरिरात साचत जाऊन न पचलेले अन्न विषार, दिवसा झोपणे आणि शरिराला अहितकर असे वारंवार खाणे या सगळ्या गोष्टींमधून शरिरात साचत जातात. रासायनिक औषधे, चांगल्या गट ‘फ्लोरा’लाही (वनस्पतींना) मारणार्‍या ‘अँटीबायोटिक्स’चा (प्रतिजैविकांचा) अवास्तव वापर आणि तो नीट करण्यासाठी प्रयत्न केला न जाणे, ही सर्व कारणेही काही काळाने शरिरावर विषवत् परिणाम दाखवत असतात.

सध्याच्या काळामध्ये सांगायचे, तर सगळ्यांच्या शरिरात हे दाहक किंवा सूज वाढवणारे पालट होतांना दिसत आहेत. यामध्ये सूक्ष्म जीवाणूंच्या भूमिका नसतात. ‘आपल्या शरिरात होत जाणार्‍या धातूच्या पालटांना वेळीच आळा घालण्यासाठी प्रयत्न न केल्याने झालेले परिणाम असतात. हे विषार साचत जाण्याने उदर, मूळव्याध, वेगवेगळी सूज मनोरोग इत्यादी विविध आजार होतात’, असे आयुर्वेदात वर्णन आहे.

आपण काय करू शकतो ?

वैद्या(सौ.) स्वराली शेंड्ये

१. सर्वसामान्य खाण्याचे आणि विहाराचे नियम पाळणे (वेळा, पदार्थांची निवड इत्यादी)

२. मनाने कोणतीही औषधे घेत बसण्यापेक्षा वैद्यकीय सल्ल्याने औषधे घेणे. ‘सिंथेटिक’ (कृत्रिम) औषधे अधिकाधिक टाळणे (जरी ती वनस्पतीमधील सक्रीय घटकापासूनच बनवली असली तरीही; कारण अख्खी वनस्पती वापरणे आणि त्यातील एक रसायन काढून वापरणे यांत भरपूर भेद आहे.)

३. अधिकाधिक आजारांसाठी आयुर्वेद औषधांची कास धरली, तर बाकी औषधे वापरायचे प्रमाण भरपूर न्यून होते, रोगांवर परिणाम तितकाच झटकन होतो, तसेच तोच तोच रोग होण्याची वारंवारता न्यून होते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे.

४. घरी बनवलेले पदार्थ ताजे खाणे जेणेकरून त्यातील रासायनिक पालट शरिरावर दूरगामी परिणाम दाखवत नाहीत. ‘रेडी टू इट’ (खाण्यायोग्य सिद्ध पदार्थ) आणि ‘पॅक्ड फूड’ (पिशवीबंद) अगदीच आवश्यकता म्हणून ठेवावे. शक्यतो ‘ऑर्गेनिक’ (सेंद्रिय) / अल्प फवारणी केलेल्या भाज्या, धान्ये खायचा प्रयत्न करावा. (जरी त्याविषयी शंका असली, तरी माहिती असतांना फवारणी केलेल्या भाज्या खाण्यापेक्षा हा पर्याय बरा आहे.)

५. वैद्यांना रसायन चिकित्सेविषयी विचारणे. रसायन म्हणजे केवळ च्यवनप्राश नव्हे.

६. बर्‍याचशा गोष्टींना सहन करण्याची शक्ती व्यायामाने वाढते. अगदी साधा नियमित केलेला चालण्याचा व्यायामही चालेल; पण त्यात नियमितता आणि सातत्य महत्त्वाचे !

७. दुसर्‍याविषयी तुलना, द्वेष, मत्सर ईर्ष्या न ठेवता स्वतःचे काम आणि आपापल्या प्रगतीकडे लक्ष ठेवावे. याने होणारा मनाचा दाह आणि चिंतेने होणारे पचनावरील परिणाम टळतात.

वरील वेगवेगळ्या कारणांनी शरिरातील धातूंमध्ये काही विशिष्ट पालट व्हायला प्रारंभ होतो, त्याच्यात एक प्रकारचा दाह उत्पन्न व्हायला लागतो. अगदीच टाळता येण्यासारखे नसेल, तेवढे सोडून वातावरण आणि अन्नातील अपरिहार्य पालट सहन करत पुढे जायचे असेल, तर हे काही मूळ नियम आणि रसायन औषधांचे साहाय्य घेऊन आरोग्य सांभाळणे श्रेयस्कर !

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (६.६.२०२४)

(साभार : फेसबुक)