हिंदु राष्ट्रासाठी जागे झाले नाही, तर उद्या इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, तरुण हिंदू

धनबाद येथे २ दिवसांच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे उद्घाटन !

डावीकडून ‘तरुण हिंदू’ संघटनेचे डॉ. नील माधव दास, दीपप्रज्वलन करतांना सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. प्रदीप खेमका, ‘इस्कॉन’चे श्री. दामोदर प्रभु, कथाकार लोचन महाराज मिश्रा, आंतरराष्ट्रीय वेदांत सोसायटीचे स्वामी निर्गुणानंद पुरी आणि देवघर येथील रामकृष्ण विवेकानंद सेवा आश्रमाचे स्वामी राधाकांतानंद महाराज

धनबाद (झारखंड), ३ डिसेंबर (वार्ता.) – हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक गावात जाऊन हिंदूंना एकत्र करून प्रबोधन करावे लागेल. जर आपण आज हिंदु राष्ट्रासाठी जागे झालो नाही, तर उद्या आपल्याला इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल, असे वक्तव्य ‘तरुण हिंदू’ संघटनेचे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी केले. ‘भारताला हिंदु राष्ट्र कसे घोषित करता येईल’, यावर विचारमंथन आणि रूपरेषा सिद्ध करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीकडून २ अन् ३ डिसेंबर असे २ दिवसांचे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात डॉ. दास बोलत होते. अधिवेशनाचा प्रारंभ शंखनाद, दीपप्रज्वलन आणि वेदमंत्रपठण यांद्वारे करण्यात आला.

या सत्रात हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या शुभ संदेशाचे वाचन करण्यात आले. या संमेलनात बिहार, झारखंड, बंगाल, ओडिशा आदी राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले आहेत.