Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त…

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे बोधचिन्ह

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संत-महंत, मंत्री यांच्यासह २० सहस्रांहून अधिक साधक आणि धर्मनिष्ठ उपस्थित रहाणार !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे बोधचिन्ह (लोगो) आणि ‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’ हे घोषवाक्य (टॅगलाईन) यांचे अनावरण करतांना डावीकडून सर्वश्री दामोदर धोंड, कमलेश बांदेकर, रमेश शिंदे, जयेश थळी, संतोष घोडगे, चेतन राजहंस, जयंत मिरिंगकर, सुजन नाईक, राज शर्मा, संजय घाटे, अनिल नाईक, मनोज गावकर आणि राघव शेट्टी

पणजी (गोवा) – समस्त मानवजातीच्या परम कल्याणासाठी, तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव सोहळा आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. हा महोत्सव १७ ते १९ मे २०२५ या ३ दिवसांच्या कालावधीत फर्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे. या भव्य महोत्सवासाठी देशभरातून अनेक संत-महंत, मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांतील मंत्री, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, विचारवंत, अधिवक्ता, उद्योजक, संपादक आदी मान्यवरांसह २० सहस्रांहून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी २१ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला उपस्थित डावीकडून सर्वश्री जयेश थळी, रमेश शिंदे, राघव शेट्टी, संतोष घोडगे, चेतन राजहंस (बोलतांना), कमलेश बांदेकर, सुजन नाईक, राज शर्मा, अनिल नाईक आणि मनोज गांवकर

पणजी येथील हॉटेल मनोशांतीमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. संतोष घोडगे, सांस्कृतिक न्यासाचे श्री. जयंत मिरिंगकर, भारत स्वाभिमानाचे श्री. कमलेश बांदेकर, ब्राह्मण महासंघ गोवाचे श्री. राज शर्मा, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, कुंडई तपोभूमी येथील पद्मनाभ संप्रदायाचे श्री. सुजन नाईक, जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी श्री. अनिल नाईक, तसेच उद्योजक श्री. राघव शेट्टी आणि कदंबाचे माजी महाव्यवस्थापक श्री. संजय घाटे हे उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे बोधचिन्ह (लोगो) आणि ‘धर्मेण जयति राष्ट्रम् । (धर्मामुळे राष्ट्र विजयी होते)’ हे घोषवाक्य (टॅगलाईन)  यांचे अनावरण करण्यात आले.

महोत्सवाला आमंत्रित संत-महंत आणि विशेष मान्यवर

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर, पतंजली योगपीठाचे संस्थापक प.पू. योगऋषि स्वामी रामदेव, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि आणि न्यासाचे महासचिव श्री. चंपत राय, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष पू. महंत रवींदद्र पुरी महाराज, अयोध्या हनुमानगढी येथील पू. महंत राजू दास, श्रीक्षेत्र तपोभूमी (कुंडई, गोवा) पिठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूर महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.

महोत्सवाविषयी माहिती देतांना श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की,

१. सनातन संस्था गेली २५ वर्षे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गोमंतकाच्या पवित्र भूमीतून, आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रामराज्य-स्वरूप आदर्श राष्ट्र निर्माण करण्यासाठी सामूहिक संकल्प केला जाणार आहे. याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व अधिक दृढ होईल.

२. भारतासमोर उभी असलेली आव्हाने पाहिली, तर सनातन धर्मियांचे अस्तित्व आणि सनातन धर्माचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे; म्हणूनच राष्ट्र्राचे सनातनत्व टिकवून ठेवणे आणि सनातन मानबिंदू अर्थात् गो, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणे यांसाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित केला आहे.

३. गोव्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर ३ दिवसांसाठी संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आणि प्रतिष्ठित यांच्यासह २० सहस्रांहून अधिक साधक अन् धर्मनिष्ठ एकत्र येत आहेत. हा जणू गोमंतक भूमीतील सनातन धर्मियांचा भव्य कुंभमेळाच असून येथे धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित होणार आहे.

४. या महोत्सवात देशभरातून येणारे संत, महंत तथा धर्मगुरु यांच्या संतसभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र, धर्म, संस्कृती आणि हिंदु समाज यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ते आपल्या ओजस्वी वाणीने मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शनही होणार आहे.

या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. संतोष घोडगे, भारत स्वाभिमानचे श्री. कमलेश बांदेकर आणि पद्मनाभ संप्रदायाचे श्री. सुजन नाईक यांनी हा कार्यक्रम म्हणजे एक कुंभमेळाच असून कार्यक्रमात आमचा सहभाग असेल असे सांगून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.


 पत्रकार परिषदेतील प्रश्‍नोत्तर –

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला लाभणार वैश्‍विक स्वरूप ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

पत्रकार – ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे राष्ट्रीय स्तरावरील आयोजन कशा प्रकारे केले जाणार आहे ?

श्री. चेतन राजहंस – महोत्सवात ब्रिटन, नेपाळ, इंडोनेशिया, बांगलादेश आदी विदेशातील हिंदुत्वनिष्ठ आणि आध्यात्मिक संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याने महोत्सवाला वैश्‍विक स्वरूप प्राप्त होणार आहे. बांगलादेश येथे हिंदूंसाठी तेथील सर्वोच्च न्यायालयात लढा देणारे अधिवक्ता रवींद्र घोष यांचीही उपस्थिती लाभणार आहे. महोत्सवात येणारे धर्मनिष्ठ आणि आध्यात्मिक संस्था यांचे प्रतिनिधी यांच्या निवासासाठी गोव्यातील मंदिर समित्यांनी मंदिराची धर्मशाळा उपलब्ध करणार असल्याचे सांगितले आहे.


पत्रकार परिषदेतील वक्त्यांचे मार्गदर्शन

महोत्सवाचे आयोजन म्हणजे कुंभमेळ्याप्रमाणे गोमंतकियांसाठी ही एक पर्वणीच ! – श्री. कमलेश बांदेकर, भारत स्वाभिमान

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ यशस्वी करण्यासाठी पतंजलि परिवार सेवेच्या रूपाने सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. कुंभमेळ्याप्रमाणे गोमंतकियांसाठी ही एक पर्वणी आहे. गोव्यातील प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीने महोत्सवातील तीनही दिवस उपस्थिती लावली पाहिजे. आगामी काळ हा सनातन धर्मासाठी अनुकूल काळ आहे आणि संपूर्ण जग सनातन धर्माकडे आशेने पहात आहे. जगात सध्या घडणार्‍या घडामोडीला केवळ सनातन धर्मातून उत्तर मिळू शकते.

गोवा आता योगभूमी बनण्याच्या मार्गावर ! – सुजन नाईक, पद्मनाभ संप्रदाय, तपोभूमी, कुंडई

आध्यात्मिक धर्मगुरु पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात नुकतेच ‘स्पिरिच्युअल फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले. गोवा आता योगभूमी बनण्याच्या मार्गावर आहे. गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’सारख्या महोत्सवाची आवश्यकता आहे. गोमंतकियांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी.

सनातन संस्कृतीची आज संपूर्ण जगाला आवश्यकता ! – श्री. संतोष घोडगे, आर्ट ऑफ लिव्हिंग

भारतीय संस्कृती आणि सनातन संस्कृती ही श्रेष्ठ असून त्याची संपूर्ण जगाला आज आवश्यकता आहे. या दृष्टीने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन महत्त्वाचे आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचा या आयोजनामध्ये पूर्ण पाठिंबा असणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

गोव्याची प्राचीन आणि एतिहासिक संस्कृती जगपुढे मांडण्याचा महोत्सवाद्वारे प्रयत्न ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

गोवा सरकार गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देत आहे. या दृष्टीने गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन होणे, ही एक अनमोल अशी पर्वणीच आहे. सनातन धर्मावर विश्‍वास ठेवणारे या ठिकाणी येणार आहेत. गोवा म्हणजे केवळ समुद्रकिनारे नाहीत, तर गोव्याची प्राचीन आणि ऐतिहासिक संस्कृती जगापुढे मांडण्याचा या महोत्सवाद्वारे प्रयत्न केला जाणार आहे.