प्रत्येक हिंदु कुटुंबाने २ गायी पाळल्या, तर भारतात गोशाळांची आवश्यकता भासणार नाही ! – अधिवक्ता आलोक तिवारी, उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती, उत्तरप्रदेश

अधिवक्ता आलोक तिवारी, उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती, उत्तरप्रदेश

रामनाथी, २२ जून (वार्ता.) – सरकार गोहत्या थांबवण्यासाठी काही करत नाही, असे अनेकांना वाटते. गायीने दूध देणे बंद केल्यावर आपले हिंदू तिला विकून टाकतात. प्रत्येक हिंदु कुटुंबाने स्वत: २ गायी पाळल्या, तर भारतात गोशाळांची आवश्यकता भासणार नाही, असे उद्गार उत्तरप्रदेशातील ‘जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती’चे उपाध्यक्ष अधिवक्ता आलोक तिवारी यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सप्तम दिनी (२२.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.

जांबाज हिंदुस्थानी सेवा समितीच्या वतीने करण्यात आलेले कार्य

१. प्रतापगड जिल्ह्यामध्ये क्रांतीकारक मंगल पांडे यांची प्रतिमा बसवण्यास विरोध होत होता. त्यानंतर आम्ही भाजपच्या आमदारांच्या साहाय्याने क्रांतीकारक मंगल पांडे यांच्या ४ प्रतिमा तेथे स्थापन केल्या.

२. आदिवासी समाज हा हिंदु धर्माचा कणा आहे. आम्ही त्यांची एक वसाहत दत्तक घेतली आहे. आता त्यांना हिंदुत्वाशी जोडून ठेवण्याचे काम करतो.

३. माघ मेळ्यामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे मार्गदर्शनही तेथे आयोजित केले होते.

४. हिंदु धर्माभिमानी आमदार श्री. राजासिंह हिंदुत्वनिष्ठांचे नेते आहेत. काही मासांपूर्वी त्यांना तेलंगाणा सरकारने अटक केली होती. तेव्हा त्यांच्या सुटकेसाठी आमच्या संघटनेने प्रतापगड जिल्ह्यामध्ये निदर्शने केली. श्री. राजासिंह यांना अटक झाल्यावर देशातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन प्रचंड विरोध करणे अपेक्षित होते; पण तसे दिसले नाही. ते हिंदूंचे नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांच्या पाठीशी सर्व हिंदूंनी उभे राहिले पाहिजे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आमच्यासाठी गुरु द्रोणाचार्यांप्रमाणे आहेत ! – अधिवक्ता आलोक तिवारी, उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती, उत्तरप्रदेश

एका वर्षी माघ मेळ्यामध्ये आमचा हिंदु जनजागृती समितीशी परिचय झाला. आम्ही यापूर्वीही कार्य करत होतो; पण त्याला योग्य दिशा नव्हती. धर्मकार्य कसे करावे ?, धर्मजागृती कशी करावी ?, व्यासपिठावरून भाषण कसे द्यावे ? तसेच कार्यकर्त्यांनी संयतपणे कसे कार्य करावे ? अशा अनेक गोष्टी आम्हाला हिंदु जनजागृती समितीकडून शिकायला मिळाल्या. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आमच्यासाठी गुरु द्रोणाचार्याप्रमाणे आहेत. परमपूज्य डॉ. आठवलेगुरुजी (सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांना पाहिल्यावर पुष्कळ ऊर्जा मिळते. तशीच ऊर्जा या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये सहभागी झाल्यावर मिळत असते आणि ती आम्हाला वर्षभर पुरते.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मधील उत्साह आिण ऊर्जा सांगत आहे की, वर्ष २०२५ मध्ये भारतात निश्चितपणे हिंदु राष्ट्र येईल.