वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्याकडून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा उद्घोष !

हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत !

आमदार टी. राजा सिंह

रामनाथी, २२ जून (वार्ता.) – राजकारण हे जनता निवडून देईल, तोपर्यंतच आहे. मला हिंदुत्वासाठी जगायचे आहे. धर्मासाठी राजकारण सोडायला मी सिद्ध आहे. आज ना उद्या मृत्यू निश्चित आहे, तर इतिहास नोंद होईल, असे मरण का नको ? देश आणि धर्म यांसाठी आम्ही मरायलाही सिद्ध आहोत. हिंदूंनी घाबरू नये. हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत, असे घणाघाती उद्गार भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या व्यासपिठावर काढले. या वेळी व्यासपिठावर प्रखर हिंदुत्वनिष्ठ वृत्तपत्र दैनिक ‘सनातन प्रभात’चे सहसंपादक श्री. संदीप शिंदे, अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मुन्ना कुमार शर्मा (नवी देहली), हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ हे उपस्थित होते.

या वेळी आमदार टी. राजा सिंह म्हणाले,

१. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश येथे राज्यकर्ते धर्मांधांचे तुष्टीकरण करत आहेत. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी मशिदी बांधणे, मदरशांना अनुदान देणे, मौलवींना वेतन देणे यांसाठी निधी दिला जातो. गोरक्षण करणार्‍या हिंदूंवर गुन्हे नोंदवले जातात. बंगालप्रमाणे तेलंगाणामध्येही हिंदूंवर अत्याचार चालू आहेत.

२. सामाजिक प्रसारमाध्यमांतून हिंदूंना जागरूक करता येईल; परंतु सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना करता येणार नाही. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रत्येक हिंदूला योगदान द्यावे लागेल.

३. भारतात १०० कोटी हिंदू असूनही आपण १ कोटी हिंदूंना धर्मकार्यासाठी एकत्र आणू शकत नाही. येणार्‍या संकटांविषयी हिंदू अनभिज्ञ आहेत. अनेक राज्यांत हिंदूंच्या हत्या होत आहेत. हिंदू केवळ धर्मांधांकडून मरण्यासाठी जिवंत आहेत का ?

४. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केल्यास भारत देश हिंदु राष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणायला हवा.

५. हिंदुत्वासाठी कार्य करण्यासाठी हिंदूंनी राज्यकर्त्यांना सत्तेवर बसवले आहे. ‘हिंदुत्वासाठी कार्य केले नाही, तर सत्तेवरून खाली खेचू’, हे हिंदूंनी राज्यकर्त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे.

६. मला विकासकामे करण्यासाठी खुर्ची (पद) नको, तर हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदूंनी मला निवडून दिले आहे. सर्व राजकीय नेत्यांनी हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.

७. स्वत:च्या रक्षणासाठी हिंदू युवक आणि युवती यांनी शस्त्रविद्या शिकणे अत्यंत आवश्यक आहे. शस्त्रविद्या शिकली, तरच हिंदू स्वत:चे आणि धर्माचे रक्षण करू शकतील.

८. भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी वर्ष २०२४ मध्ये भारतातील प्रत्येक हिंदु आवाज उठवेल. हिंदू जागरूक होतील, तेव्हा धर्मांधही शांत बसणार नाहीत. त्या वेळी काय करायचे ? याची योजना धर्मांधांनी आधीच आखून ठेवली आहे.

९. हिंदूंची संख्या कुठे अल्प आहे ? कोणत्या भागात धर्मनिरपेक्ष हिंदू आहेत ? अशा ठिकाणांची नोंद धर्मांधांकडे आहे. धर्मांध आक्रमक होतील, तेव्हा हे हिंदूही मारले जातील. त्यामुळे हिंदूंनी कुंभकर्णाची झोप सोडून वेळीच जागरूक व्हावे.

१०. आतंकवाद्यांचे रूप घेऊन धर्मांध हिंदूंना मारण्यासाठी सिद्ध झाले आहेत. स्वत:च्या रक्षणासाठी प्रत्येक गावातील हिंदूंनी शस्त्रविद्या शिकून घ्यावी, अन्यथा भविष्यकाळात धर्मांधांकडून हिंदू मारले जातील.

११. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अहंकार सोडून एकत्रित कार्य करणे आवश्यक आहे. स्वत:ला हिंदुत्वाचा ठेकेदार म्हणवणार्‍यांनी हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना जवळ करायला हवे.

१२. येणारा काळ भयंकर आहे. त्या वेळी संकटाला सामोरे जाण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदूंनी पुढे येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे.

साधनेतूनच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल !

‘भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी हिंदूंनी साधना करणे आवश्यक आहे. हिंदूंनी भगवतांशी लीन राहून हिंदुत्वाचे कार्य करणे आवश्यक आहे. साधना केली, तरच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल.’- आमदार टी. राजासिंह, तेलंगाणा