ब्रह्मोत्सव सोहळ्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे !

सोहळा चालू असतांना सायंकाळी आकाशात जांभळा रंग पसरला होता. ‘जांभळा रंग हे श्रीविष्णूचे प्रतीक आहे’, असे यापूर्वी सप्तर्षींनी सांगितले आहे.
  • ब्रह्मोत्सवाच्या स्थळाकडे जात असतांना मार्गामध्ये चारचाकी आणि बस यांची फार मोठी रांग होती. त्यांना भगवे झेंडे लावले होते. त्यांच्या मागोमाग जातांना ‘ब्रह्मोत्सवाची वाहनफेरी चालू आहे’, असे वाटत होते.
  • ब्रह्मोत्सवाला आलेल्या सर्व साधकांच्या चेहर्‍यावर भाव, आनंद आणि उत्साह ओसंडून वहात होता. प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने सोहळा सुंदर होण्यासाठी प्रयत्न करत होता.
  • ब्रह्मोत्सवाला प्रारंभ होण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पूर्वी घेतलेल्या सभांची ध्वनीफीत लावण्यात आली होती. त्यामुळे वातावरणात त्यांचे अस्तित्व जाणवत होते.
  • भगवे फेटे घातलेले साधक, पिवळे फेटे घातलेले संयोजक आणि संपूर्ण मंडपावर लावलेले भगवे ध्वज, ‘गोविंदा गोविंदा’चा भावपूर्ण जयघोष इत्यादी ‘हिंदु राष्ट्र लवकरच अवतरणार !’ याची ग्वाही देत होते.
ब्रह्मोत्सव झाल्यानंतर दिव्य रथाचे दर्शन घेतांनाही साधक भावविभोर झाले होते. गुरुदेवांच्या आगमनाने पवित्र झालेल्या त्या परिसरातील माती साधक समवेत घेऊन गेले.
  • या ब्रह्मोत्सवाला कर्नाटक राज्यातील अनेक साधक आले होते. तेव्हा ब्रह्मोत्सवाला प्रत्यक्ष प्रारंभ होण्यापूर्वी सूत्रसंचालक श्री. विनायक शानभाग यांनी एकदा कन्नड भाषेत निवेदन केले. यातून त्यांनी व्यापकत्वाचे दर्शन घडवले, तसेच त्यांची समयसूचकता लक्षात आली.
  • ब्रह्मोत्सवापूर्वी अन्य सोहळ्यांतील चित्रफिती दाखवल्या जात होत्या, त्या वेळी साधकांची ये-जा चालू होती. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले गुरुदेवांच्या रथाचे आगमन कार्यस्थळी झाले, त्या वेळी सर्वत्र शांतता पसरली. सर्व जण स्तब्ध झाले.
  • ब्रह्मोत्सव संपून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले रथातून उतरून अन्य वाहनाने साधकांना दर्शन देत कार्यस्थळाहून निघाले, त्या वेळी पुन्हा एकदा साधकांच्या भावाश्रूंचा बांध फुटला.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक