‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकांगी कारवाई करत आहे ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’

सांगली, १४ ऑगस्ट (वार्ता.) – वर्षातील ३६५ दिवस पाचवेळा मशिदींच्या भोंग्याद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी ‘प्रदूषण होते’ अशी आवई उठवत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकांगी कारवाई करत आहे, तसेच हिंदूंच्या सणांना अपकीर्त करणारे अहवालही प्रसिद्ध करत आहे.

३६५ दिवस वाजणार्‍या भोंग्यांविषयी मंडळाची काय भूमिका आहे ? हे मंडळाने स्पष्ट करावे, अशी मागणी या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी केली. ते समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त बोलत होते. हे आंदोलन सांगली येथील गावभातील मारुति चौकात सायंकाळी ५ वाजता करण्यात आले. या आंदोलनात ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित सर्व अधिकार्‍यांना निलंबित करा’, अशी मागणीही करण्यात आली.

या आंदोलनात हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या प्रीती पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी देशभरात होत असलेल्या हिंदूंच्या हत्यांची चौकशी ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’कडे देऊन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

या प्रसंगी ‘भाजप सांस्कृतिक आघाडी’चे प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल म्हणाले, ‘‘प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रबोधन करण्याचे कारण पुढे करत केवळ हिंदु धर्मातील सणांच्या विरोधातच कार्य करतांना दिसते. यापुढील काळात हिंदु समाज हे सहन करणार नाही.’’ या प्रसंगी भाजपचे प्रदेश सचिव

श्री. पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘सध्याची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. नूपुर शर्मा यांना जिवे मारण्यासाठी पाकिस्तानच्या युवकाला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली. त्यामुळे आता हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता आहे.’’

या वेळी समर्थभक्त श्री. शेखर कोडोलीकर म्हणाले, ‘‘ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या काळात हिंदु संघटित झाले आणि स्वराज्यासाठी लढा दिला, त्या पद्धतीने आज होतांना दिसत नाही; कारण हिंदूंच्या मनातील धर्मविचार आणि धर्मासाठीचा ओलावा अल्प झाला आहे. आज हिंदू संघटित नसल्याने हिंदूंच्या हत्या होत आहेत. धर्मप्रेम वाढवून संघटित झाल्यास हिंदूंच्या हत्या निश्चितच थांबवू शकतो.’’

या आंदोलनासाठी भाजपचे श्री. उदय मुळे, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. अविनाश मोहिते, श्री. बाळासाहेब पाटील, अजितकुमार काळे, सौ. माधुरी वसगडेकर, श्री. विठ्ठल मुगळखोड यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.