सिंधुदुर्गातील एस्.टी. कर्मचार्‍यांना आता ‘बेस्ट’ परिवहन सेवेत पाठवले जाणार नाही

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस्.टी. कर्मचार्‍यांना यापुढे मुंबईत ‘बेस्ट’ परिवहन सेवेत पाठवण्यात येणार नाही, असे आश्‍वासन एस्.टी. महामंडळाच्या मुख्य सचिवांनी दिले आहे. त्यामुळे मुंबईच्या दौर्‍यावर असलेल्या एस्.टी. महामंडळाच्या २५ गाड्या परत जिल्ह्यात पाठवण्यात येणार आहेत.

‘बेस्ट’ परिवहन सेवेत जिल्ह्यातील एस्.टी. कर्मचार्‍यांना पाठवण्यात येत आहे. मुंबई येथे सेवेसाठी गेलेल्या अनेक कर्मचार्‍यांना, तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील एस्.टी.चे कर्मचारी मुंबईत पाठवू नयेत, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे भाजपचे नेते तथा आमदार नीतेश राणे यांनी एस्.टी. महामंडळाच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली.