राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : २५.४.२०२१

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

जगात हिंदु आणि ख्रिस्ती ३५ टक्क्यांनी, तर मुसलमान ७३ टक्क्यांनी वाढत आहेत ! – प्यू रिसर्च सेंटर

‘जगात एकीकडे मोठे धर्म (ख्रिस्ती, हिंदु आदी) ११ ते ३५ टक्क्यांच्या गतीने, दुसरीकडे मुसलमानांची लोकसंख्या ७३ टक्क्यांनी म्हणजे सर्वाधिक गतीने वाढत आहे. वर्ष २०१० मध्ये मुसलमान १५९ कोटी होते, ते वर्ष २०५० मध्ये २७६ कोटी होतील, असा अहवाल अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने दिला.’

त्रावणकोर देवस्वम् समितीकडून मंदिरांच्या भूमीत रा.स्व. संघाकडून घेण्यात येणार्‍या प्रशिक्षणावर बंदी !

‘त्रावणकोर देवस्वम् समितीच्या प्रशासनातील १ सहस्र २४२ हिंदु मंदिरांच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांना काम करण्यास अनुमती देण्यावर, तसेच शारीरिक प्रशिक्षण किंवा सामूहिक कवायत करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारची अनुमती देणार्‍या देवस्वम् समितीच्या अधिकार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची चेतावणीही समितीकडून देण्यात आली आहे.’

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कार्य कौतुकास्पद ! – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज

संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज

‘हिंदु जनजागृती समितीसह सनातन संस्थेने ‘धर्म आणि राष्ट्र’विषयक चित्रमय प्रदर्शनाद्वारे धर्माविषयीचे बारकावे सांगितले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचे या संघटनांचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे कौतुकोद्गार छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधीश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांनी काढले. हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला भेट दिल्यावर त्यांनी वरील कौतुकोद्गार काढले.’

राजकीय पक्ष हिंदु राष्ट्र आणू शकत नसल्याने हिंदूंनी ते आणण्यासाठी कार्य करावे ! – पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज, पिठाधिश्‍वर, शाम्भवी

‘राजकीय पक्षांच्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्र’ येऊ शकत नसल्याने हिंदूंना संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्रा’साठी कार्य करावे लागेल. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसारख्या संस्थांनी संघटित होऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे उद्गार हरिद्वार येथील शाम्भवी पिठाधिश्‍वर पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी काढले. ते समितीच्या कार्यकर्त्यांशी बोलत होते.’

विजापूर (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २२ सैनिक हुतात्मा !

जिहादी आतंकवाद आणि नक्षलवाद यांचा बीमोड न करणार्‍या आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !

‘विजापूर (छत्तीसगड) येथे ३ एप्रिलला झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांनी एकूण २२ सैनिकांना ठार केल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी रॉकेट लाँचरचा वापर केला.’ (नक्षलवाद्यांकडे रॉकेट लाँचरसारखी शस्त्रे सापडतात, याचा अर्थ त्यांना होणारा अर्थपुरवठा कुठून होतो, हे शोधून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)

विनामास्क निवडणुकीचा प्रसार केल्याने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांना देहली उच्च न्यायालयाची नोटीस

‘कोरोना संसर्गामुळे देशातील रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. सर्वांना कोरोना महामारीचे नियम पाळणे आवश्यक असतांना नेते विनामास्क निवडणुकीच्या सभा घेत प्रचार करत आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई का नाही ? तसेच सर्वसामान्य माणसांनीच नियम पाळावेत का ? असे प्रश्‍न असणार्‍या याचिकेवर देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.’

अयोध्येतील हनुमानगढी येथील महंतांची विटांनी ठेचून हत्या !

‘प्रसिद्ध हनुमानगढी येथील महंत आणि नागा साधू कन्हैया दास यांची ३.४.२०२१ च्या रात्री अज्ञातांनी विटांनी डोके ठेचून हत्या केली. त्यांचा मृतदेह येथील चरणपादुका मंदिराच्या गोशाळेत सापडला. कन्हैया दास बसंतिया पट्टीच्या गुलचमन बाग येथील महंत होते. वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.’

भीक मागा, चोरी करा; पण ऑक्सिजन द्या ! – देहली उच्च न्यायालय

‘देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. त्यातून ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि व्हेंटिलेटर यांचा तुटवडा भासत आहे. अशा वेळी देहली उच्च न्यायालयाने ‘भीक मागा, उधार घ्या, चोरी करा; पण ऑक्सिजन द्या’, अशा शब्दांत केंद्र सरकारला निर्वाणीचा सल्ला दिला आहे.’’

बांगलादेशमध्ये गेल्या ५० वर्षांपासून हिंदूंवर अत्याचार होत आहेत ! – अमेरिकेतील नेत्या तुलसी गबार्ड

तुलसी गबार्ड

‘बांगलादेशमध्ये गेल्या ५० वर्षांपासून हिंदूंवर अत्याचार होत आहेत. पाक सैन्याने वर्ष १९७१ मध्ये लाखो बंगाली हिंदूंची हत्या केली. महिलांवर बलात्कार केले, तसेच लाखो हिंदूंना हाकलून लावले. ढाका विद्यापिठात ५ ते १० सहस्र लोकांची हत्या झाली होती. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तेथील हिंदूंवरील अत्याचारांची मालिका थांबलेली नाही, अशी खंत अमेरिकेतील नेत्या तुलसी गबार्ड यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून व्यक्त केली आहे.’

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची नातेवाइकांना २ दिवस माहिती नाही !

जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचे नुकतेच निधन झाले; मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्याविषयी कोणतीही माहिती न दिल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी संबंधित प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे अखेर अधिकार्‍यांनी त्यांची चूक मान्य करत पुरेशी आरोग्य यंत्रणा नसल्याने हा प्रकार झाल्याचे सांगितले.’

नक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंच रामा तलांडी यांची गोळ्या झाडून हत्या !

रामा तलांडी

‘गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते रामा तलांडी (वय ३७ वर्षे) यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.’