बंगालमध्ये मतदानाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू

सुरक्षादलांच्या गोळीबारात चौघांचा मृत्यू

  • भारतात काही ठिकाणी मतदानाच्या वेळी हिंसाचार होणे ही सर्वसामान्य घटना झाली आहे. बॉम्ब, बंदूक आदींचा सर्रास वापर या वेळी केला जातो. यातून भारतातील मतदान कसे होते, हे लक्षात येते !
  • बंगालमध्ये अशा घटना वारंवार घडत असतांना तेथे सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे !

कोलकाता – बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान १० एप्रिल या दिवशी झाले. या वेळी कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात अनेक जण घायाळ झाले. पोलिसांनी लाठीमार करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. याच वेळी बूथ क्रमांक २८५ मध्ये मतदान केंद्राबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. सुरक्षादलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण घायाळ झाले. या वेळी अज्ञातांकडून गावठी बॉम्बही फेकण्यात आल्याने अनेक जण घायाळ झाले.

( सौजन्य : ABP NEWS )

अज्ञातांच्या गोळीबारात ठार झालेले आनंद बर्मन हे भाजपचे समर्थक होते. त्यामुळेच त्यांना गोळी मारण्यात आली, असा आरोप करण्यात येत आहे, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने यात भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपाने हा तरुण मतदानकेंद्रावर पोलिंग एजंट होता, असा दावा केला आहे.