भारताची स्थिती वाईट करणार्‍यांना नियतीने (ईश्‍वराने) दिली कठोर शिक्षा !

प्रतीकात्मक छायाचित्र

देहली – तुम्ही कुणाचे वाईट कराल, तर तुमच्या सोबतही वाईटच होईल, या जन्मात नाही, तर पुढील जन्मात ईश्‍वर आपल्या कर्माचे फळ देतोच, या सिद्धांतावर भारतियांची श्रद्धा आहे. भारतावर वेगवेगळ्या कालखंडामध्ये आक्रमण करणार्‍या किंवा भारतियांशी निष्ठूरपणे वागणार्‍या विदेशींचाही शेवट अतिशय वाईट झाला आहे. इंग्रजांचा भारतात त्यांचा पाया रचणारा लॉर्ड क्लाईव्ह, भारताची फाळणी करणारे लॉर्ड माऊंट बॅटन, पाकिस्तानचे नामकरण करणारे चौधरी रहमत अली, भारतातून अनेक मूल्यवान हिरे चोरून नेणारा फ्रेंच प्रवासी आणि हिर्‍यांचा व्यापारी टेवर्निअर किंवा जालियनवाला बाग हत्याकांड घडवणारे जनरल रेनिनाल्ड डायर अन् लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओ डायर असो, ईश्‍वराने त्यांना त्यांच्या कर्माची कठोर शिक्षा केली. त्यांच्या अंतिम समयी त्यांची अक्षरश: दुर्दशा पहायला मिळाली.

१. भारत पादाक्रांत करणार्‍या लॉर्ड क्लाईव्हने नशेत स्वत:चा गळा चिरणे

लॉर्ड क्लाईव्ह भारतात आला नसता, तर इंग्रजांना त्यांचे मूळ भारतात रोवता आले नसते. लॉर्ड क्लाईव्हची क्षमता पाहून भारत पादाक्रांत करण्यासाठी ब्रिटनने त्याला ३ वेळा भारतात पाठवले. ईस्ट इंडिया कंपनीने लॉर्ड क्लाईव्हला बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनवले आणि तेथून ब्रिटीश सत्तेचा पाया रचला. त्या क्लाईव्हचा शेवट अतिशय वाईट झाला. कंपनीच्या पैशाचा अपहार केल्याच्या आरोपाखाली ब्रिटनच्या संसदेत त्याच्या विरोधात चौकशी बसवण्यात आली. त्यानंतर त्याला अफीमचे व्यसन लागले आणि वर्ष १७७४ मध्ये एक दिवस त्याने नशेमध्ये असतांना स्वत:च गळा चिरून घेतला. ज्याने भारताची सत्ता इंग्रजांच्या पायाशी घातली, तो स्वत: वेड्यासारखा मरण पावला.

२. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी उत्तरदायी असलेल्या माऊंट बॅटन याचा हृदयदावक मृत्यू

भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंट बॅटन यांच्याविषयी अनेकांना कौतुक वाटत होते. ‘चर्चिलने ठरवल्यानुसार सोव्हिएत संघ आणि भारत यांच्यामध्ये एक ‘बफर स्टेट’ (अंतस्थ राज्य) असावे; म्हणून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. या गुप्त योजनेला माऊंट बॅटनने प्रोत्साहन दिले’, असे नंतर उघड झाले. अर्थात् पाकिस्तान निर्माण करण्यासाठी माऊंट बॅटन सवार्र्धिक उत्तरदायी होते. २७ ऑगस्ट १९७९ या दिवशी माऊंट बॅटन उन्हाळ्याच्या सुट्या घालवण्यासाठी आयर्लंडमध्ये होते. त्या वेळी आयर्लंडची ‘आयरिश रिपब्लिक आर्मी’ ब्रिटीश साम्राज्यवादाच्या विरोधात होती. माऊंट बॅटनची बोट किनार्‍याला लागणारच होती की, एका भयानक स्फोटामध्ये माऊंट बॅटन समवेत त्यांचे २ मुले, १ मुलगी, जावई आदींसह अनेकांचा मृत्यू झाला.

३. पाकिस्तानचे नामकरण करणारे चौधरी रहमत अली यांचा वाईट शेवट

पाकिस्तान हे नाव ज्या चौधरी रहमत अली यांनी ठेवले होते, त्यांना पाकिस्तानमध्ये अत्यंत वाईट वागणूक मिळाली आणि शेवटही खूप वाईट झाला. वर्ष १९३३ मध्ये जेव्हा शेवटच्या गोलमेज परिषदेत त्यांनी ब्रिटीश सरकार आणि भारतीय प्रतिनिधी यांच्यासाठी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत अली यांनी प्रथम ‘पाकिस्तान’ हा शब्द वापरला. बॅ. जिना यांनी ६ वर्षांनी ते नाव स्वीकारले. फाळणीनंतर पाकिस्तानचे तुकडे पाहून अली यांना आनंद झाला नाही. त्यांनी लंडनमधून त्यावर टीका केली. अली एप्रिल १९४८ मध्ये पाकिस्तानला गेले. त्यांना वाटले की, त्यांनी ज्या देशाचे नाव ठेवले, तेथील लोक त्यांना चांगला सन्मान देतील; परंतु पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली यांनी त्यांचा पुष्कळ अपमान केला. त्यांचे सारे सन्मान काढून घेतले. त्यामुळे अपमानित होऊन अली लंडनमध्ये परत गेले. तेथे गेल्यावर लोकांनी त्यांची चेष्टा केली. त्याचा त्यांना मोठा धक्का बसला. पैसेही संपले होते. शेवटी वर्ष १९५१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण आयुष्य पाकिस्तान निर्मितीसाठी खर्च करणार्‍या अलीचा असा शेवट झाला.

टेवर्निअर

४. भारतीय हिर्‍यांच्या ‘शापा’मुळे टेवर्निअरचा भयानक मृत्यू ?

फ्रेंच प्रवासी टेवर्निअर हा हिर्‍यांचा व्यापारी होता. तो जहांगीरच्या शासनकाळात भारतात आला होता. या टेवर्निअरवर आधारित हॉलीवूडमध्ये ‘द डायमंड क्विन’ चित्रपट निघाला. या चित्रपटात एका शापित हिर्‍यामुळे जगभरातील कित्येक प्रसिद्ध लोकांचा वाईट पद्धतीने मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले. यात टेवर्निअरचाही समावेश होता. भारतातील अनेक प्रसिद्ध हिरे त्याने खरेदी केले होते; परंतु ‘अनेक मूल्यवान हिरे त्याने भारतातून चोरून नेले होते’, असा त्याच्यावर आरोप होता. बहुतांश प्रसिद्ध हिरे गोलकुंडा खाणीतून निघाले होते. फ्रान्सच्या राजाकडून त्या हिर्‍यांच्या बदल्यात त्याला प्रचंड संपत्ती मिळाली होती. ८४ व्या वर्षी टेवर्निअरला रानटी कुत्र्यांनी लचके तोडून ठार मारले.

जालियनवाला बाग हत्याकांड

५. जालियनवाला बाग हत्याकांडातील दोन्ही डायरचा अकाली अंत !

स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी घडवलेले जालियनवाला बाग हत्याकांड कुणीच विसरू शकत नाही. यात जनरल रेगिनाल्ड डायर याने क्रूर पद्धतीने सहस्रो भारतियांना ठार केले. या हत्याकांडाच्या पुढल्याच वर्षी तो लंडनला निघून गेला आणि तेथे निवृत्तीचे जीवन जगू लागला. लंडनमध्ये त्याच्या विरोधात चौकशी बसवण्यात आली. त्याला अनेक प्रकारचे ‘ब्रेन स्ट्रोक’चे झटके येऊ लागले. त्याच्या शरिराचा एक भाग निकामी झाला. एका अर्धांगवायूच्या झटक्यामध्ये त्याची वाचा गेली. एका खोलीत अनेक मास तळमळत असतांना २३ जुलै १९२७ या दिवशी त्याचा मृत्यू झाला. जालियनवाला हत्याकांडाचा आदेश देणार्‍या डायरला ईश्‍वराने कठोर शिक्षा दिली.

जालियनवाला घटनेचा दुसरा गुन्हेगार लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओ डायर होता. त्याने जनरल डायरला वाचवण्यात मोठी भूमिका निभावली. थोर क्रांतीकारक उधमसिंह यांनी १३ मार्च १९४० या दिवशी लंडनमध्ये त्याला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारले. जालियनवाला बागच्या दोन्ही गुन्हेगारांचा अकाली अंत झाला.

(संदर्भ : ‘झी न्यूज हिंदी’चे संकेतस्थळ)