जगद्गुरु संत तुकोबांच्या वैकुंठगमनास हत्या म्हणणे कितपत योग्य ?

फाल्गुन कृष्ण द्वितीया, म्हणजेच ‘संत तुकारामबीज’ उत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी जगद्गुरु संत तुकोबा कीर्तन करतांना अदृश्य होऊन सदेह वैकुंठाला गेले होते; म्हणून ‘तुकारामबीज उत्सव’ असतो. त्यामुळे देहूमध्ये संतमेळा किंवा संतांची मांदियाळी जमत असते. अनुपम सोहळ्यास महाराष्ट्रातील वारकरी एकत्र येऊन ‘ज्ञानदेव-तुकाराम’ गजर करतात; परंतु त्याच काळात हिंदु समाजात जातीय विद्वेष निर्माण करणार्‍या काही विद्रोही संघटनांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात कार्यरत होऊन ‘संत तुकारामाचे वैकुंठगमन नव्हे, तर हत्या !’ किंवा ‘तुकारामांची हत्या झाली आहे’, अशा नीच विषयाद्वारे समाजाला तोडण्याचा प्रयत्न करतात.

१. विद्रोही आणि विद्वेषी संघटनांनी वैकुंठगमनाविषयी वाद निर्माण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणे

वास्तवामध्ये संत तुकाराम यांच्या हत्येविषयी कोणताही पुरावा विद्रोही टोळ्यांकडे नाही. केवळ मनात येईल त्याप्रमाणे ते लेखन करतात किंवा ‘प्रपोगंडा’ (प्रसार) करत असतात, तसेच ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’, असे म्हणणार्‍या कणखर संत तुकोबांची हत्या होऊ शकते, एवढे ते लेचेपेचे नव्हते किंवा छत्रपती शिवरायांचे गुरु असलेल्या संत तुकोबांची हत्या समाजाने सहन केली असती का ? तरीसुद्धा समाजाला एकतेच्या सूत्रात बांधणार्‍या संत तुकोबांसारख्या संतांच्या नावाने उपद्व्याप करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात. काही विद्रोही आणि विद्वेषी संघटनांची पिलावळ संत तुकारामबीज उत्सवाच्या कालावधीत ‘तुकाराम वैदिक कि विद्रोही ?’ आणि ‘तुकोबांचे वैकुंठगमन कि हत्या ?’, असा चुकीचा इतिहास मांडून सामाजिक एकोप्याचे वातावरण कलुषित करतात. वारकरी संप्रदाय किंवा पंथ आजही संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमनावर ठाम असून त्यांनी विद्रोही मंडळीच्या टीकाटिपणीस कधीच भीक घातली नाही. वारकरी बंधूंनी ‘संत तुकोबा आमचे आहेत आणि आम्ही आमचे पाहून घेऊ. तुम्ही (विद्रोही टोळ्या) कशाला लुडबुड करता’, अशी कणखर भूमिका घेऊन विद्रोही टोळ्यांना अनेक वेळा तोंडघशी पाडले आहे. तरीसुद्धा काही विद्रोही टोळ्या फाल्गुन कृष्ण द्वितीया या दिवशी ‘तुकारामबीज’ उत्सवाच्या निमित्ताने कीर्तन, व्याख्यान, समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमे यांद्वारे संत तुकोबांच्या वैकुंठगमनाविषयी समाजात संभ्रम निर्माण करणारे लेखन अन् साहित्य प्रसारित करून समाजाची दिशाभूल करतात.

२. विद्वेषी डॉ. आ.ह. साळुंखेंची विद्रोही मांडणी आणि त्याला वारकर्‍यांनी दिलेली कवडीमोल किंमत !

‘तुकोबांनी वेद, देव, व्रतवैकल्य, वैदिक धर्म नाकारला होता. त्यांची हत्या झाली होती’, अशा प्रकारची खोटी मांडणी फाल्गुन मासात केली जाते, तसेच डॉ. आ.ह. साळुंखे यांनी ‘विद्रोही तुकाराम’ या पुस्तकाद्वारे संत तुकोबांना ‘विद्रोही तुकाराम’ करून समाजात प्रस्तुत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांनीसुद्धा ‘संत तुकारामांची हत्या रामदासी ब्राह्मणांनी केली’, प्रा. जेमिनी कडू, सुनील टाक यांनी ‘संताचा छळ आणि हत्या’, तसेच विद्रोही मा.म. देशमुख आणि प्रवीण गायकवाड यांनीसुद्धा ‘तुकाराम महाराजांची हत्या केली’, असा प्रसार केला आहे. ‘तुकोबांनी वैदिक विचाराच्या विरुद्ध बंड पुकारल्याचे सांगून सदेह वैकुंठगमनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करून ‘तुकोबांची हत्या झाली’, असा विषय प्रस्तुत करून वारकरी बंधूंमध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केला; पण वारकरी बंधूंनी दोघांची पुस्तके अन् विचार यांना कवडीचीही किंमत दिलेली नाही. त्यामुळे संत तुकोबांचे वैकुंठगमन आणि तुकोबा वैदिक कि विद्रोही ? यावर विचार करण्याची आवश्यकता आहे.

३. छत्रपती शिवरायांच्या सनदीमधील उल्लेख

‘संत तुकाराम महाराज फाल्गुन कृष्ण द्वितीया या दिवशी कीर्तन करतांना अदृश्य होऊन सदेह वैकुंठगमनास गेले आहेत’, हे सत्य जगातील संत तुकाराम महाराज यांच्या कोट्यवधी भक्तांना मान्य आहे, यात कुणाचेही दुमत नाही, हे तत्कालीन अनेक पुराव्यांचा अभ्यास केल्यास लक्षात येते. जगद्गुरु संत तुकोबा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते आणि त्यांच्या राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवरायांनी संत तुकाराम महाराज यांचे पुत्र नारायण महाराज यांना सनद दिली आहे. त्यात ‘संत तुकोबा कीर्तन करता करता अदृश्य झाले’, असा विख्यात उल्लेख केला आहे.

४. छत्रपती शिवरायांच्या गुरूंची हत्या हा शुद्ध पाखंड !

संत जगनाडे महाराज यांच्या साहित्यामध्ये ‘जगद्गुरु तुकोबाराय प्रथम पहरी सशरीर वैकुंठाला गेले’, असा उल्लेख आहे. तसेच जेव्हा देहूची गादी संत तुकोबांचे वैकुंठगमन मान्य करून बीज उत्सव साजरा करते, तेव्हा इतरांनी लुडबुड करण्यात काहीच अर्थ नाही. संत निळोबाराय, संत तुकोबाचे बंधू कान्होबाराय आणि संत जगनाडे महाराज यांच्या अभंगांमध्येही ‘संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले’, असे उल्लेख आढळतात. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांच्या गुरूंची हत्या होणे शक्य नसून होत असलेला प्रसार शुद्ध पाखंड किंवा फसवणूक म्हणावी लागेल.


संत तुकारामांच्या हत्येचा ‘फेक नॅरेटीव्ह’ (खोटे कथानक) !

‘संत तुकोबाराय हे सदेह वैकुंठाला गेले नाहीत, तर त्यांची हत्या करण्यात आली’, अशी मांडणी काही लोक करतात. संत तुकोबांच्या अनुषंगाने अनेक प्रकारचे ‘नॅरेटिव्ह’ अलीकडच्या काळात सिद्ध करण्यात आले आहेत. ‘विज्ञानाच्या कसोटीवर वैकुंठगमन शक्य नाही, तसेच तुकोबांची हत्या झाल्याचेही कोणतेच पुरावे नाही. जर तुकोबांची खरेच हत्या झाली होती, तर छत्रपती शिवरायांपासून ही गोष्ट लपली नसती. छत्रपती शिवराय हे तुकोबारायांना गुरु मानत. त्या काळामध्ये तुकोबांची हत्या करण्यात आली असती, तर ती गोष्ट छत्रपती शिवरायांना निश्चितच समजली असती. त्या वेळी त्यांनी एक राजा म्हणून आपल्या गुरूंची अशी आपल्या राज्यात हत्या करणार्‍याला सोडलेच नसते.

छत्रपती शिवराय अथवा संत तुकाराम महाराज यांच्या संदर्भाने जे जे पुरावे आपल्यासमोर आहेत, त्यामध्ये कुठेही अशा प्रकारचा प्रसंग घडल्याचे आपल्याला दिसून येत नाही. ‘संत तुकाराम महाराजांची हत्या करण्यात आली आणि ही गोष्ट त्या काळी दडवून ठेवण्यात आली’, असे म्हणणेही चुकीचे आहे; कारण छत्रपती शिवरायांचे हेर खाते होते, अशा हेर खात्याला संत तुकोबारायांच्या संदर्भात घडणार्‍या घटनेचा पत्ता लागला नसता का ? असाही प्रश्न उपस्थित होतो.

(साभार : विश्व संवाद केंद्र)

 ५. ‘वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम’ ठरवणे आणि वैकुंठगमनास हत्या ठरवणे कितपत योग्य ?

आ.ह. साळुंखे यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या ‘विद्रोही तुकाराम’ पुस्तकाद्वारे वैदिक तुकारामास विद्रोही प्रस्तुत करून ‘त्यांनी धर्म शास्त्राविरुद्ध बंड पुकारले होते’, असे चित्र उभे केले आहे, तसेच वैदिक सण, उत्सव, व्रतवैकल्य, पूजापाठ नाकारल्याचे म्हटले आहे, तसेच पुरुषोत्तम खेडेकर, प्रा. जेमिनी कडू, प्रवीण गायकवाड यांनी ‘तुकोबांची हत्या झाली’, असा प्रसार केला आहे. संत तुकोबांच्या गाथेचे निरीक्षण केल्यास अर्धी गाथा वैदिक धर्म, वेद, व्रतवैकल्य आणि पंढरपूरचा विठ्ठल यांसंबंधी भाष्य केलेले आहे.

वेदांसंबंधी कठोर भूमिका घेतांना संत तुकोबा म्हणतात, ‘मातेची जो थाने फाड़ी, तया जोडी कोण ते । वेदां निंदी चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ ।।’ संत तुकोबांनी उपरोक्त अभंगामध्ये ‘वेदाची निंदा करणार्‍यांस भ्रष्ट, सुतक्या, खळ आणि मातेचे स्तन फाडणारा’ म्हटले आहे.

पुढे संत तुकोबा म्हणतात, ‘वेद जया गाती, आम्हा तयाची संगति । तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न, तैसा तो दुर्जन शिवा नये ।’ ‘वेदाचे गुणगान आणि प्रमाण मानणार्‍याची आम्हाला संगती होऊ शकते’, असे निक्षून सांगितले आहे.

व्रतवैकल्यासंबंधी संत तुकोबा म्हणतात,

‘आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ।
कंठी मिरवा तुळसी ।।
व्रत करा एकादशी ।
म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस ।।

‘मुखाने विठ्ठल नामस्मरण करावे, म्हणजे आपण सुखी होतो. गळ्यात तुळशीमाळ मिरवा, एकादशी व्रत करा’, असा संदेश निर्वाळा संत तुकोबांनी दिलेला आहे. व्रतवैकल्यासाठी जेवढे आग्रही होते तेवढेच हरिकथेविषयीसुद्धा ते आग्रही होते.

तुकोबांचा हरि कोण ?

गीता जेणे उपदेशिली, ते ही विटेवर माऊली ।
वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाचि साधला ।।
विटेवरी समचरण, तो हा रुक्मिणीरमण ।
वेद शास्त्रा माहेर, केले दासा उपकार ।।

‘४ वेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे, शास्त्राचा सार आणि वेदांची मूर्ती असलेला विठ्ठल माझा प्राणसखा, सांगाती आहे. ज्यांनी गीतेचा उपदेश केला, तोच वेदशास्त्र माहेर रुक्मिणीरमण विटेवर उभी असलेली माऊली आहे. त्यामुळेच ‘वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम’ ठरवणे आणि छत्रपती शिवरायांनी संत तुकोबांचे पुत्र नारायण महाराज यांना दिलेल्या सनदीमध्ये ‘अदृश्य झाल्याचे विख्यात’ केलेला उल्लेख पहाता वैकुंठगमनास हत्या ठरवणे कितपत योग्य आहे ?

– श्री. अशोक राणे, अकोला, महाराष्ट्र