वर्ष २०२५ ते २०२७ हा प्रलयाचा काळ !

‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

आचार्य उपेंद्रजी यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करतांना पू. पृथ्वीराज हजारे (उजवीकडे)

रामनाथी (गोवा) –  वर्ष २०२५ ते २०२७ हा प्रलयाचा काळ आहे, असे अगस्त ऋषींच्या नाडीपट्टीमध्ये सांगितले आहे, अशी माहिती ‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आणि श्री विद्या गुरु आचार्य उपेंद्रजी यांनी येथे दिली. आचार्य उपेंद्रजी यांनी २१ एप्रिल २०२५ या दिवशी रामनाथी, गोवा येथील  सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी सनातनच्या साधकांना मार्गदर्शन केले. या वेळी आचार्य उपेंद्रजी यांच्यासमवेत त्यांची पत्नी, तसेच त्यांचे काही शिष्यगण उपस्थित होते. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आचार्यजींचे स्वागत केले आणि परिचय करून दिला. सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी आचार्य उपेंद्रजी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून, तसेच सनातनचे ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. या वेळी सनातनचे साधक उपस्थित होते.

सनातन आश्रमासारखे वातावरण अन्यत्र कुठेच पाहिले नाही ! – आचार्य उपेंद्रजी

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

आचार्य उपेंद्रजी आश्रमाविषयी म्हणाले, ‘‘मी आश्रम पाहून प्रभावित झालो आहे. मी भारतभरातील सर्व आश्रमांना भेटी दिल्या आहेत; परंतु अशा प्रकारची व्यवस्था, स्वच्छता, नियोजन, सेवाभाव, नम्रता आणि चैतन्यमय वातावरण अन्यत्र कुठेही मी पाहिलेले नाही. येथील कार्य हे आपलेच कार्य आहे, असा प्रत्यय मला येथे आला आहे.’’

आचार्य उपेंद्रजी यांनी केलेले मार्गदर्शन

भारत विश्वगुरु होण्यासाठी पात्र झाला आहे का ?

भारत विश्वगुरु होण्यासाठी पात्र झाला आहे का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. आपण त्यासाठी सिद्ध झालो आहोत का ? जगातील इतर धर्मांतील लोक आपल्याला (भारताला) ‘गुरुमाऊली’ मानण्यास सिद्ध आहेत का ? आपले वागणे आदर्श असायला हवे आणि सर्व जगाने आपल्याला आदर्श मानले पाहिजे.

भारताला विश्वगुरु करण्यासाठी देशातील प्रत्येक गुरूंना एका माळेत गुंफण्याचे कार्य करत आहे !

या देशातील प्रत्येक गुरु म्हणजे एक मणी आहे. भारताला विश्वगुरु करण्यासाठी त्यांना सर्वांना एका माळेत गुंफण्याचे काम अगस्त्य ऋषींनी नाडीपट्टीच्या माध्यमातून माझ्याकडे दिले आहे आणि त्याच उद्देशाने मी भारतभ्रमण करत आहे.

आध्यात्मिक ग्रंथांतील दुर्लभ ज्ञान लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत उलगडून सांगत आहे !

समाजात विविध प्रकारचे लोक आहेत. काही देव मानणारे भक्तीमार्गी आहेत, काही नास्तिक आहेत, काही विज्ञाननिष्ठ आहेत, ज्यांना प्रत्येकाचे उत्तर वैज्ञानिक भाषेत हवे असते. काही अंधश्रद्धाळू आहेत, जे प्रत्येकाला पाया पडतात. या सर्वांना आपल्या आध्यात्मिक ग्रंथांतील ज्ञान, अध्यात्मशास्त्र सरळ आणि समजेल अशा सोप्या भाषेत सांगण्यासाठी या आध्यात्मिक शास्त्रांचे ‘डिकोडिंग’ म्हणजे जे उलगडून सांगण्याचे कार्य आपण चालू केले आहे. भारत विश्वगुरु होण्यासाठी आपण आपले शास्त्र जगातील सर्व लोकांना समजेल, अशा भाषेत मांडले पाहिजे, हे ध्येय समोर ठेवून हा प्रयत्न चालू केला आहे. त्यामुळे युवावर्ग अध्यात्माकडे आकर्षित होऊ लागला. विस्मृतीत गेलेले दुर्लभ असे आध्यात्मिक ज्ञान जगासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. दुर्गासप्तशती, अथर्वशीर्ष, शतचंडी यांतील गुप्त ज्ञानाचा सर्वसामान्यांनासुद्धा लाभ व्हावा, त्याची फलश्रुती त्यांना मिळावी, यादृष्टीने ते सोप्या भाषेत उलगडून सांगण्याचे कार्य चालू केले आहे.