Punjab Police Arrested Khalistani Terrorists : पंजाबमध्ये १३ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

  • आय.एस्.आय.च्या साहाय्याने चालवण्यात येत होते तळ

  • पोलीस ठाण्याच्या प्रमुखांची हत्या करण्याचा होता कट

आतंकवाद्यांकडून जप्त करण्यात आलेले साहित्य

अमृतसर (पंजाब) – बंदी घालण्यात आलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल (बी.के.आय.) या खलिस्तानी आतंकवादी संघटनेशी संबंधित १३ आतंकवाद्यांना पोलिसांनी अटक केली. यांमध्ये एका अल्पवयीन आतंकवाद्याचाही समावेश आहे. (पंजाबमध्ये अल्पवयीन मुलेही खलिस्तानी आतंकवादाकडे वळत असल्याने तेथील आतंकवादाची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक ! – संपादक) ४ दिवस चाललेल्या पंजाब पोलिसांच्या कारवाईत आतंकवाद्यांचे २ तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. आय.एस्.आय.च्या साहाय्याने ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ हे तळ चालवत होती. ‘या आतंकवाद्यांना राज्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची हत्या करायची होती’, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही आतंकवाद्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

१. जालंधर येथील गुप्तचर विभाग आणि बाटला येथील पोलीस यांनी आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. सतनाम सिंह उपाख्य सत्ता हा फ्रान्स येथून, तर जसविंदर सिंह उपाख्य मन्नू अगवान हा ग्रीस येथून हे तळ चालवत होते.

२. वर्ष २०१० मध्ये पंजाबमध्ये मोठ्या प्रामाणात स्फोटके सापडली होती. त्या वेळी सतनाम सिंह याचे नाव प्रथमच उजेडात आले होते.

३. अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांकडून २ ग्रेनेड, १ ग्रेनेड लाँचर, २.५ किलो वजनाची अत्याधुनिक स्फोटके, डिटोनेटर्स आदी साहित्य जप्त करण्यात आले.

४. पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, हे आतंकवादी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या सांगण्यावरून भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी होते. अटक केलेल्या आतंकवाद्यांनी अनेक पोलीस ठाण्यांना लक्ष्य करण्याचाही कट रचला होता.

संपादकीय भूमिका

  • पंजाब खलिस्तानी आतंकवाद्यांनी किती पोखरला आहे, हे दर्शवणारी ही घटना ! राज्यात खलिस्तानी आतंकवाद आत्ताच संपुष्टात आणला नाही, तर भविष्यात भारताची डोकेदुखी वाढेल, हे निश्चित !
  • भारतातील देशविघातक कारवायांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे ढीगभर पुरावे असतांना त्याला संपवण्यासाठी सरकार आणखी कशाची वाट पहात आहे ?