२६/११ च्या आतंकवादी आक्रमणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात ! – माधव भांडारी, भाजप प्रदेश प्रवक्ते

माधव भांडारी

पुणे – २६/११ च्या (२६ नोव्हेंबर २००८ च्या) आतंकवादी आक्रमणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात होता. हे आक्रमण १ महिन्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबरमध्येच होणार होते, अशा गुप्तचरांची सूचना असतांना ते १ महिना पुढे गेले. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असणार्‍या व्यक्तीच्या सहभागाविना एवढे मोठे आक्रमण होऊ शकत नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी पुणे येथील श्री. विक्रम भावे यांच्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केले.

वक्तव्याविषयी माधव भांडारी यांचे स्पष्टीकरण

या वक्तव्याविषयी माधव भांडारी यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आक्रमण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती दिली होती. त्यातील ८५ टक्के जागांचीही माहिती देण्यात आली होती. जर आक्रमणाविषयी सरकारला ५ महिन्यांपूर्वी माहिती होती, तर आक्रमण रोखण्याचे दायित्व तत्कालीन सरकारचे होते. मग सरकारने आक्रमण का रोखले नाही ?

जे कुणी दोषी वाटतात, त्यांची चौकशी करून कारवाई करा ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

जर राष्ट्रवादी काँग्रेसपैकी कुणी या आक्रमणामध्ये दोषी असतील, तर त्यांची चौकशी करून कारवाई केली पाहिजे, एवढे मी या प्रकरणी सांगू शकतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.