साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम १० लाख – मंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी – विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणार्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यावर्षीपासून १० लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी १ कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली. साहित्यिक नसतील, तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे ‘पुस्तकांचे गाव’ लोकार्पण सोहळा अन् कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन २० एप्रिलला करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक नाटककार गंगाराम गवाणकर, शासकीय अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत पुढे म्हणाले,
१. कोकणाला साहित्यिकांची मोठी परंपरा लाभलेली आहे. मराठी भाषेचा मंत्री झाल्यावर माझ्या हातून मंगेश पाडगावकरांच्या गावी कवितेचे दालन पुस्तकांचे गाव, कुसमाग्रजांच्या शिरवाडे गाव पुस्तकांचे गाव चालू करण्याचे नियतीच्या मनात असावे. साहित्यिकांचा पुरस्कार सोहळा मुंबईत आणि विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यात घेतले. पहिला साहित्य भूषण पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना देण्याचे भाग्य लाभले.
२. ज्ञानेश्वरांनी ज्या वेळी ज्ञानेश्वरी लिहिली किंवा एकनाथांनी अभंग लिहिले, त्याच वेळी मराठी भाषा ही अभिजात आहे, हे सिद्ध झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा उपयोग केला, त्याच वेळेला मराठी भाषा अभिजात झालेली होती.
३. कवी केशवसुत, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक यांचा आदराने उल्लेख लंडनमध्ये झाला होता. कोकणाने राज्याला दिलेले साहित्यिक पहाता कोकण साहित्याच्या दृष्टीने प्रगत आहे. हे साहित्य आपण सर्वांनी पोहचवले पाहिजे.
४. यापुढे बालसाहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन होईल. या प्रत्येक साहित्य संमेलनासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे.
५. मराठी भाषा ताकदवान करण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. देशाच्या सांस्कृतिक विभागाचा पाया हा साहित्यिक आहे. जोपर्यंत साहित्यिक नाटक लिहीत नाही, तोपर्यंत नाटक रंगमंचावर येत नाही. अनेकांनी याचा अभ्यास केला पाहिजे. जर साहित्यिक नसतील, तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही. याचा अर्थ आपल्या सगळ्या सांस्कृतिक परंपरेचा पाया हा आपल्या महाराष्ट्रातील साहित्यिक आहेत.
अध्यक्षीय भाषणात पद्मश्री मधू मंगेश कर्णिक म्हणाले, ‘‘एका हातात भाकरी असेल, तर ती भाकरी आपल्याला जगवेल. दुसर्या हातात पुस्तक असेल, तर का जगावं ? हे ते पुस्तक सांगेल.’’
या वेळी संचालक डॉ. देवरे यांनी पुस्तकांच्या गाव या मागील शासनाची भूमिका सांगितली. कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनीही मनोगत व्यक्त केले.