दाभोलकर कोण होते ?

‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने…

जिवंत असतांना फारसे प्रसिद्ध नसलेले डॉ. दाभोलकर मृत्यूनंतरच अधिक प्रसिद्ध झाले. त्यामुळे खरेतर आता दाभोलकरांचा फार परिचय देण्याची आवश्यकता नाही; परंतु मागे एका प्रकरणात उल्लेख केल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा खून झाल्यास पोलीस भाऊबंदकी, मालमत्तेचा वाद, कौटुंबिक कलह, विवाहबाह्य संबंध इत्यादी सर्वच दिशांनी अन्वेषण करतात; पण दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी हिंदुत्वनिष्ठांना ‘टार्गेट’ (लक्ष्य) करून अन्वेषणाची दिशा ठरवली होती. त्याच दिशेने अन्वेषण केले गेले. म्हणून तर शस्त्रतस्कर मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या २ तरुणांना अटक केल्यावर त्यांच्याकडून जप्त केलेल्या पिस्तुलातून दाभोलकरांना मारले असल्याचे फॉरेन्सिक प्रयोगशाळेत निष्पन्न होऊनही त्यांच्या विरोधात नंतर आरोपपत्रही प्रविष्ट करण्याइतके पुरावे मिळाले नाहीत अन् दोघे जामिनावर सुटले; पण तूर्तास दाभोलकर नेमके कोण होते ? आणि काय करत होते ? त्यावर प्रकाश टाकू.

‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ

१. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा अल्पसा परिचय

मी लेखात उल्लेख केल्याप्रमाणे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होईपर्यंत मलाही त्यांच्याविषयी फार काही माहिती नव्हती. हत्येनंतरच ते अधिक प्रसिद्ध झाले. त्यामुळे त्यांच्याविषयी इंटरनेट आणि उपलब्ध साहित्यातून माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा असे लक्षात आले की, नरेंद्र दाभोलकर हे त्यांच्या आई-वडिलांचे दहावे अपत्य. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ व्यवसाय केला आणि नंतर व्यवसाय बंद करून ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला (धंद्याला नाही) लागले. प्रथम शाम मानव यांच्या ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’मध्ये त्यांनी काम केले; मात्र बहुतेक वर्चस्ववादातून त्यांचे काही फारसे पटले नाही आणि नरेंद्र दाभोलकरांनी स्वत:ची ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ नावाची वेगळी चूल मांडली. राजकीय लागेबांधे आणि जनसंपर्कात माहीर असलेले नरेंद्र दाभोलकर हे शाम मानव यांच्यापेक्षा अधिक अन् लवकर प्रसिद्धीला आले.

आजकाल प्रसिद्धी मिळवणे अधिक सोपे आहे. प्रवाहाविरुद्ध वागले, बोलले की, लगेच प्रसिद्धी मिळते. ती प्रसिद्धी ‘सु’ कि ‘कु’ (चांगली किंवा वाईट) याच्याशी देणे-घेणे नसेल, तर केवळ प्रसिद्धी मिळवणे अधिकच सोपे होऊन जाते. दाभोलकरांचेही काहीसे तसेच झाले, असे म्हणायला हरकत नाही. दाभोलकरांच्या एकूण क्रियाकलापांचा अभ्यास केला, तर या देशातील बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या धर्मश्रद्धांच्याच ते विरोधात होते, हे अनेक उदाहरणांतून पहायला मिळते.

श्री. विक्रम भावे

२. दाभोलकर आणि अंनिस यांची हिंदुविरोधी भूमिका

दाभोलकरांनी अनेक हिंदु साधू-संतांवर, सत्यनारायण पूजेसारख्या व्रतावर आणि हिंदु धर्मातील गोपाल संतान विधीसारख्या विधींवरही टीका केली होती. जी गोष्ट विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही, ती सरसकट अंधश्रद्धा मानण्याचा दाभोलकरांचा हेका दिसून येतो. त्यामुळे पुढे पुढे प्रसिद्धी डोक्यात गेलेले दाभोलकर गणपति आणि दत्त यांसारख्या देवतांवरही ‘माणसाचे धड आणि हत्तीचे डोके, असा कधी देव असतो का ?’ किंवा ‘तीन तोंडाचा देव कसा काय असू शकतो ?’, अशा टीका करू लागले होते. ‘होळीत पोळी अर्पण करण्याऐवजी ती गरजूंना द्या किंवा शंकराच्या पिंडीवर दूध ओतण्यापेक्षा ते भुकेल्यांना द्या’, अशाही मोहिमा त्यांनी चालवल्या; पण येशू ख्रिस्त आणि महंमद पैगंबर यांवर त्यांनी टीका केल्याचे त्यांच्या हयातीत एकही उदाहरण नाही.

शनिशिंगणापूर येथील लोकांची अशी श्रद्धा आहे की, शनिमहाराज तेथील लोकांचे आणि त्यांच्या घरांचे रक्षण करतात. त्यामुळे तेथील घरे, दुकाने आदींना दारे किंवा कड्या-कुलपे  नसतात. दाभोलकरांनी ही अंधश्रद्धा ठरवली आणि शनिशिंगणापुरात ‘चला चोरी करायला’ या नावाचे उफराटे आंदोलन केले; मात्र याच दाभोलकरांनी ‘मुडद्यांना पुरलेल्या चबुतर्‍यावर चादरी घालून काय उपयोग ? त्यापेक्षा त्या चादरी गरिबांना द्या’, असे म्हणत कधी कुठल्या दर्ग्यात जाऊन ‘चला चादरी काढायला’, असे आंदोलन केल्याचे आठवत नाही किंवा चर्चमध्ये विद्युत् दिवे असतातच. तेव्हा दगडा-मातीच्या येशूच्या किंवा मेरीच्या पुतळ्याला मेणबत्तीच्या प्रकाशात वेगळे काय दिसणार ? त्यापेक्षा अजूनही ज्या गावांत वीज पोचली नाही, तेथे त्या मेणबत्त्या दिल्या पाहिजेत’, असे म्हणत कधी कुठल्या चर्चमध्ये ‘चला मेणबत्त्या विझवायला’ किंवा ‘चला मेणबत्त्या काढायला’, असे आंदोलनही केल्याचे उदाहरण त्यांच्या हयातीत दिसून येत नाही.

जगातील यच्चयावत हिंदु साधू-संत भोंदूच असतात, याच तत्त्वावर दाभोलकरांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम (कि धंदा ?) चालत होता, असे दिसते. नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराजांच्या आश्रमात दाभोलकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्वत: गेले होते आणि त्यांनी ‘नरेंद्र महाराजांना ‘सवाल-जवाबात’ हरवले’, असे दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात कि कशात तरी छापले होते. त्या वेळी स्वत: नरेंद्र महाराज थरथर कापत होते, असाही साक्षात्कार दाभोलकरांना झाला होता, असे म्हणतात. त्या वेळी नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी ‘दाभोलकर आणि त्यांच्या टोळीचे हातपाय तोडण्याची धमकी दिली होती’, असाही आरोप केला गेला होता.

२ अ. ‘जादूटोणाविरोधी कायद्या’च्या माध्यमातून उघड झालेली हिंदुविरोधी भूमिका : वर्ष २००३ मध्ये नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या अंधटोळीने ‘जादूटोणाविरोधी कायदा’ नावाचा एक कायदा आणण्याचे ठरवले होते. कायद्याचे एकूण स्वरूप पहाता हा कायदा एखाद्या आतंकवाद्यासारखाच होता, असे म्हणावे लागेल; कारण यातील कित्येक प्रावधाने तशीच होती. या कायद्याप्रमाणे ‘मूर्तीपुढे पशूबळी दिला, तर फौजदारी गुन्हा नोंद’ होणार होता. यातील गोम अशी की, मूर्तीपुढे पशूचा बळी दिला, तरच गुन्हा ठरणार होता. संयुक्त चिकित्सा समितीपुढे या कलमावर चर्चा चालू असतांना हिंदुत्वनिष्ठांनी या कलमाला विरोध केला. वरवर गोड वाटणारे हे कलम होते. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना विरोध करतांनाही अडचण येईल, असे अंधटोळीला आणि स्वत: दाभोलकरांनाही वाटले असावे; पण हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते अन् अधिवक्ते त्यांच्या या भुलभुलैयात अडकले नाहीत. त्यांनी कठोरपणे सांगितले की, ‘मूर्तीपुढे पशूचा बळी’ याऐवजी ‘धार्मिक कारणाने पशूचा बळी’ असा पालट करा. मग मात्र दाभोलकरांची आणि त्यांच्या अंधटोळीची मोठी अडचण झाली. दाभोलकर आणि त्यांची अंधटोळी त्यांच्याच जाळ्यात अडकले; कारण ‘धार्मिक कारणाने पशूचा बळी…’ असा पालट केल्यास ईदच्या दिवशी मुसलमानांच्या विरोधात गुन्हे नोंदवावे लागतील अन् त्यामुळे मुसलमान दुखावतील, ही भीती दाभोलकर अन् अंधटोळीला होती. परिणामी ते कलमच पूर्णपणे रहित करण्यात आले.

या कायद्यातील दुसरे कलम असे होते, ‘स्वत:मध्ये अतींद्रीय शक्ती असल्याचे भासवणे.’ यालाही हिंदुत्वनिष्ठांनी आक्षेप घेतला. कारण कोणताही कायदा करतांना त्याच्या नावापासून ते प्रत्येक कलमातील प्रत्येक शब्दाची अभिप्रेत व्याख्या द्यावी लागते. तो काही दिवाळी अंक नव्हे की, दाभोलकरांना वाटला म्हणून छापला आणि त्यांना जेव्हा जसा अर्थ काढायचा असेल, तेव्हा तसा अर्थ काढला ! त्यामुळे हे कलम आपोआपच कायद्याच्या कटकटीत अडकले. ‘स्वत:मध्ये अतींद्रीय शक्ती असल्याचे ‘भासवून’ इतरांना ठकवणे, फसवणे, भुलवणे हा गुन्हा मानण्यात येईल’, अशी दुरुस्ती मान्य करणे दाभोलकरांना भाग पडले. ‘स्वत:मध्ये अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून’ या वाक्यातच दोन गोष्टी गर्भित आहेत. एक म्हणजे स्वत:मध्ये खरोखर अतींद्रिय शक्ती असणे आणि दुसरी म्हणजे स्वत:मध्ये अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवणे. आता दोन्ही गोष्टींचे अर्थ, परिमाण, मोजपट्ट्या सगळेच कायद्यात स्पष्ट हवे, म्हणजे एखाद्यामध्ये अतींद्रिय शक्ती खरेच आहे, याचे निकष काय ? आणि एखादा तसे भासवतो आहे, हे कसे ओळखायचे ? इतरांना ठकवणे, फसवणे, भुलवणे यांसारख्या कृती जरी घडल्याच नाहीत, तरीही अतींद्रिय शक्तीबद्दल निव्वळ बोलणे किंवा लिहिणे हाच गुन्हा ठरवण्याचा दाभोलकरांचा मनसुबा यामुळे तडीस जाऊ शकला नाही.

अशा प्रकारे २५-२६ कलमे घालून कृत्रिमरित्या फुगवलेल्या या मसुद्यातील हवा जात जात तो मसुदा १२-१३ कलमांवर येऊन स्थिरावला. आता या कायद्यांत जी काही कलमे शेष राहिली आहेत, त्यांना पर्यायी कलमे आधीपासून भारतीय दंड विधान आणि भारतीय दंड प्रक्रिया संहितेत आहेतच. त्यामुळे कायदेतज्ञांच्या मते या कायद्याची खरच आवश्यकता आहे का ?, हाच मुळात अभ्यासाचा आणि चर्चेचा विषय आहे; परंतु दाभोलकरांनी आयुष्यभर पाठपुरावा करून, प्रसंगी आंदोलन करून, प्रसंगी आमरण उपोषणाची धमकी देऊन, तर प्रसंगी रक्ताने स्वाक्षरी केलेले निवेदन देण्यासारखे अघोरी प्रकार करून ज्या कायद्यासाठी जंग जंग पछाडले, तो कायदा दाभोलकरांच्या मृत्यूनंतर लगेचच जसा आहे तसाच पारित केला अन् महाराष्ट्र शासनाने दाभोलकरांना श्रद्धांजली वाहिली.

इतका द्वाड आणि तकलादू जादूटोणाविरोधी कायदा संमत करण्यासाठीही या व्यवस्थेने दाभोलकरांचाच नरबळी घेतला असे म्हणायचे का ?

३. दाभोलकरांचे विज्ञाननिष्ठ ‘कन्फ्युजन’ (भ्रम)

कार्ल मार्क्सच्या पावलावर पाऊल टाकत निघालेल्या दाभोलकरांनी कित्येक वेळा जाहीर भाषणांतूनही ‘धर्म हीच अफूची गोळी’ असल्याचे भाष्य केले होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनीही अनेकदा तशी मुक्ताफळे उधळली होती. त्यांचे हे विज्ञाननिष्ठ ‘कन्फ्युजन’ बर्‍याचदा उघड झाले आहे. शनिच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशाचे सूत्र असो कि कुठल्या तरी मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेशाचा मुद्दा असो. असे काही मुद्दे पुढे आले की, हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून दाभोलकर आणि त्यांच्या चेल्यांना खुले आव्हान केले जात असे की, हाजी अली किंवा तशाच कुठल्याही दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी किंवा बुरखा, हलाला, खतना अशा गोष्टींच्या विरोधातही दाभोलकर अन् त्यांचे चेले आंदोलन करणार का ?

अशा वेळी दाभोलकर आणि त्यांचे चेले घोषित करत की, आम्ही हिंदू आहोत ना, मग आम्ही आमच्या धर्मातील अंधश्रद्धा नाहीशा करण्यासाठी आधी प्रयत्न करणार.’ म्हणजे हिंदु धर्मावर टीका करायची असेल, तेव्हा ‘धर्म हीच अफूची गोळी’ आणि इस्लामचे सूत्र आले की, झटक्यात दाभोलकर अन् त्यांचे चेले हिंदू होऊन जात.

४. अंनिसचे नक्षलवाद्यांशी संबंध

दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप अनेकदा झाले आणि दाभोलकरांनी अन् अंधटोळीने ते आरोप फेटाळले. नरेश बनसोड, शैलेश वाकडे आणि नरेंद्र भुरळे या अंधटोळीच्या कार्यकर्त्यांना हिंसक कारवायांचा कट रचल्याप्रकरणी नक्षलवादी म्हणून अटक झाली होती. त्यातील नरेश बनसोड हा समितीचा गोंदिया जिल्ह्याचा प्रमुख होता. त्याच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले होते. या नक्षलवाद्यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आणि त्यांची शासनाने बिनशर्त सुटका करावी, यासाठी नक्षलवाद्यांच्या ‘दंडकारण्य स्पेशल झोन कमिटी’ने महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली अन् गोंदिया जिल्ह्यांत ‘बंद’ची घोषणा केली होती. आश्चर्य म्हणजे तेव्हा नरेंद्र दाभोलकरांनीही पत्रक काढून ‘ते पकडलेले कार्यकर्ते आमचे असून त्यांना सोडून देण्यात यावे’, अशी शासनाला विनंती केली होती (कि धमकी दिली होती ?). ‘अटक आरोपींपैकी शैलेश वाकडे याच्याशी दाभोलकरांचा काहीही संबंध नाही’, हे सांगायला दाभोलकरांनी २०१० मध्ये पत्रकार परिषद घेतली; मात्र त्यात ते असेही म्हणतात, ‘वाकडे हा अंनिसचा केवळ कार्यकर्ता होता; पण संघटनेत त्याच्याकडे कुठलेही पद नव्हते.’

मराठी भाषिक दैनिक ‘पुण्यनगरी’मध्ये २ ऑक्टोबर २०११ या दिवशी छापून आलेल्या वृत्तात असे म्हटले होते, ‘महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या ६२ स्वयंसेवी संस्थांमध्ये दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ५० वा क्रमांक आहे…’

५. अंनिसला विदेशातून निधी !

‘एफ्.सी.आर्.ए.’ म्हणजे ‘फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट (परदेशी योगदान नियमन कायदा).’ एखाद्या स्वयंसेवी संस्थेला विदेशातून देणग्या घ्यायच्या असतील, तर या कायद्याप्रमाणे नोंदणी करावी लागते. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशी नोंदणी केली असूनही आम्ही विदेशातून कधीच देणग्या घेतल्या नाहीत’, असे दाभोलकरांनी अनेकदा दडपून खोटे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र आर्थिक वर्ष २००६-०७ ते २००८-०९ या काळात अंनिसला विदेशातून, म्हणजे ‘महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका’ या अमेरिकेतील संस्थेकडून मिळालेली रक्कम १४ लाख ७५ सहस्र रुपयांपेक्षा अधिक आहे.

दाभोलकरांचा ‘परिवर्तन’ नावाचा आणखी एक ट्रस्ट आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी केलेल्या या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून पुढील नावे दिसतात.

अ. नरेंद्र अच्युत दाभोलकर

आ. देवदत्त अच्युत दाभोलकर

इ. प्रसन्न देवदत्त दाभोलकर

ई. शैला नरेंद्र दाभोलकर

उ. हमीद नरेंद्र दाभोलकर

ऊ. मुक्ता नरेंद्र दाभोलकर

ए. अनघा तेंडोलकर

ऐ. अनिल गुंडोपंत तेंडोलकर

ओ. मंगला सुभाष वाघ

या ‘परिवर्तन’ न्यासावरील विश्वस्तांची नावे वाचल्यावर आपल्या लक्षात येते की, ‘परिवर्तन’ हा न्यास दाभोलकर कुटुंबियांचा खासगी न्यास असल्यासारखाच आहे. या ‘परिवर्तन ट्रस्ट’च्या स्थापनेचा मुख्य उद्देशच ‘मानसिक आरोग्य’ आणि ‘व्यसनमुक्ती’ असा आहे. (म्हणजे दाभोलकरांनी ट्रस्ट स्थापन करतांना तसे म्हटले तरी आहे.) ट्रस्टचे कार्यक्षेत्र चंद्रपूर अणि गडचिरोली आहे. या परिवर्तन ट्रस्टलाही आर्थिक वर्ष २०१०-११, २०११-१२ आणि २०१२-१३ या आर्थिक वर्षांत ‘स्विस एड’ या स्वित्झर्लंड येथील संस्थेकडून १९ लाख ९१ सहस्र ५०० रुपये आणि ‘महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका’ या अमेरिकेतील संस्थेकडून ३६ लाख १६ सहस्र ५४२ इतकी रक्कम देणगी म्हणून मिळाली आहे.

गंमत म्हणजे ‘स्विस एड’ या स्वित्झर्लंड स्थित संस्थेने ‘परिवर्तन’ ट्रस्टला दिलेला निधी हा ‘कृषी प्रकल्पा’साठी दिला होता. ‘परिवर्तन’ ट्रस्ट कृषी क्षेत्रात काम करत नसतांना आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करत असतांना सगळा निधी खर्च मात्र झाला, असे स्पष्टीकरण दिले आहे. ‘साधना’ नावाच्या आणखी एका ट्रस्टकडे तो निधी परस्पर वळवण्यात आला असून ट्रस्टची ‘एफ्.सी.आर्.ए.’ नोंदणी नाही.

६. रॉकेल माफियाला दिलेला अंनिसचा पुरस्कार परत घेण्याची नामुष्की

विदर्भातील अंनिसचा कार्यकर्ता पन्नालाल राजपूत याला दाभोलकरांनी अंनिसच्या वतीने पुरस्कार दिला होता; पण राजपूत हा स्थानिक रॉकेल माफीया असून त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद असल्याचे  म्हटले गेल्याने त्यावर बराच वादंग झाला. त्यामुळे त्याला दिलेला पुरस्कार परत घेण्याची नामुष्की दाभोलकरांवर ओढवली होती.

७. दाभोलकरांनी निकटवर्तीयांनाही अंधारात ठेवले !

माधव बावगे हे दाभोलकरांचे निकटचे सहकारी आणि अंनिसचे जुने जाणते कार्यकर्ते. माधव बावगेंची ३० जानेवारी २०२२ या दिवशी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर दिलेली मुलाखत आहे. त्यात बावगे म्हणतात, ‘अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेसाठी ट्रस्ट आहे, हेच आम्हाला कित्येक वर्षे ठाऊक नव्हते.’ माधव बावगेंसारख्या दाभोलकरांच्या अत्यंत निकटवर्तीयांची ही कथा तिथे इतर कार्यकर्त्यांचे काय ?

अशा कित्येक घटना आणि गोष्टी आहेत, ज्यात दाभोलकरांनी अनेकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दुखावून त्यांच्याशी वैर घेतले होते. त्यामुळे दाभोलकरांची हत्या ही विचारसरणीतून झाली, असे म्हणणे हीच मुळात अंधश्रद्धा आहे.

– श्री. विक्रम भावे, वरसई, तालुका पेण, जिल्हा रायगड.(साभार : ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकातून)

राष्ट्र आणि धर्म प्रेमी, जिज्ञासू, वाचक, विज्ञापनदाते यांना सूचना

‘दाभोलकर हत्या आणि मी’ हे पुस्तक खरेदी करून त्याचा आर्वजून अभ्यास करा आणि या पुस्तकात दिल्याप्रमाणे जे निर्दोष असतील, त्यांना त्यांच्या अनुभवाच्या आधारे पुस्तके लिहिण्यास साहाय्य करा. त्यामुळे खरे गुन्हेगार आणि त्यांना साहाय्य करणारे पोलीस असल्यास ते उघडकीस येतील. – संपादक

हे पुस्तक लवकरच ‘ॲमेझॉन किंडल’वर उपलब्ध होणार आहे, याची नोंद वाचक आणि जिज्ञासू यांनी घ्यावी.