
नाशिक – जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गड येथे सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी चैत्रोत्सवानिमित्त राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. ‘श्री वेंकटेश्वरा फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव डोळे प्रतिवर्षीप्रमाणे कुटुंबियांसह दर्शनासाठी आले होते. यात्रेच्या शेवटच्या दिवशी गड परिसरात ठिकठिकाणी पडलेला प्लास्टिक कचरा, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, भाविकांनी तिथेच सोडून दिलेले कपडे त्यांना दिसले. त्यातून दुर्गंधी पसरली होती. त्यांनी पुढाकार घेत ‘फाउंडेशन’चे २०० सदस्य, गडाचे विश्वस्त मंडळ, सुरक्षा रक्षक, कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचार्यांच्या साहाय्याने १८ एप्रिल या दिवशी ३ सहस्र किलो कचरा संकलित करून धार्मिक स्थळी स्वच्छता ठेवावी, हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून दिला. (अशी मोहीम राबवल्याविषयी ‘श्री वेंकटेश्वरा फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव डोळे यांचे अभिनंदन ! – संपादक)
सप्तशृंगी गडावर प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे फाऊंडेशनच्या वतीने गड आणि परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. भाविकांनीही स्वच्छता ठेवावी, यासाठीही जनजागृती केली जाणार आहे. याविषयी श्री वेंकटेश्वरा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव डोळे म्हणाले, ‘‘धार्मिक स्थळ असो कि आपला परिसर, तेथे स्वच्छता ठेवणे हे आपले प्रत्येकाचे दायित्व आहे. परिसरात कचरा होऊ न देणे, परिसर स्वच्छ ठेवणे याविषयी जनजागृतीच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली.’’
संपादकीय भूमिकाधार्मिक स्थळांच्या ठिकाणी कचरा करणारे भाविक म्हणजे धर्मशिक्षण न दिल्याचाच परिणाम होय ! |