
पुणे – राज्यांमध्ये मराठीचीच सक्ती आहे. हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही. हिंदीऐवजी अन्य कोणतीही भाषा शिकायची असेल, तर तसा पर्याय विद्यार्थ्यांना दिला जाईल. त्याविषयीचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ‘भारतीय विकास परिषदे’च्या कार्यक्रमासाठी ते पुण्यात आले असतांना त्यांना ‘हिंदी सक्ती मागे घ्यावी का ?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी पत्रकारांसमोर स्वत:ची भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणात ३ भाषा अनिवार्य आहेत. त्यात २ भारतीय आणि १ इंग्रजी असा नियम आहे. राज्यात मराठी सक्तीची आहे. दुसरी भाषा भारताबाहेरची घेता येणार नाही. मंत्र्यांच्या समितीच्या मान्यतेनुसार दुसरी भाषा ही हिंदी असावी, अशी शिफारस केली आहे. हिंदी विषयाचे शिक्षक उपलब्ध आहेत. अन्य भाषांसाठी पुरेसे शिक्षक नाहीत. त्यामुळेच ही शिफारस करण्यात आली होती. हिंदीऐवजी अन्य दुसरी भाषा शिकायची असेल, तर विद्यार्थ्यांना तशी संधी दिली जाईल.