राहुल गांधी यांनी भारताची अपकीर्ती करणे बंद करावे !

  • अमेरिकेत भारताची अपकीर्ती केल्याचे प्रकरण

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधी यांना रोखठोक प्रत्युत्तर  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल गांधी

मुंबई – काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन भारत आणि भारतीय लोकशाही यांची अपकीर्ती केली. हे निंदनीय आहे. वारंवार निवडणुकांमध्ये हरल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसत आहे; पण ते विरोधी पक्षाचे नेते असतांना आपल्याच देशाची विदेशात जाऊन अपकीर्ती करत असतील, तर त्यांच्याविषयी संशय निर्माण होतो की, ते नेमका कुणाचा अजेंडा (धोरण) चालवत आहेत ? राहुल गांधी यांनी जनतेत जाऊन काम करावे. जगभरात फिरून आणि भारताची अपकीर्ती करून स्वतःची विश्वासार्हता वाढणार नाही. जनतेत त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली, तरच त्यांची मते वाढतील; पण त्याऐवजी भारताला अपकीर्त करण्याचेच त्यांचे काम चालू आहे. जे महाराष्ट्रात हरले, हरियाणात हरले, देहलीत हरले, त्यांनी भारताची अपकीर्ती करणे बंद करावे, असे रोखठोक प्रत्युत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिले. राहुल गांधी यांनी अमेरिकेत ब्राऊन विद्यापिठाच्या दौर्‍याच्या वेळी तेथील विद्यार्थ्यांशी बोलतांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत ‘निवडणूक आयोगाने तडजोड केली’, असे सांगितले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

काय म्हणाले होते राहुल गांधी ?

राहुल गांधी म्हणाले होते की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. हे एक वास्तव आहे; मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी ५.३० पर्यंत झालेल्या मतदानाचीच आकडेवारी दिली. संध्याकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत जेव्हा मतदानाची वेळ संपलेली असते, त्या कालावधीत ६५ लाख मतदारांनी मतदान केले. असे घडणे अशक्य आहे; कारण एका मतदाराला मतदान करायला साधारण ३ मिनिटे लागतात. जर ही वेळ लक्षात घेतली, तर रात्री २ वाजेपर्यंत मतदार रांगेत उभे होते आणि त्यानंतर पहाटेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली, असा याचा अर्थ होतो; पण असे घडल्याचे पहाण्यास मिळाले नाही. निवडणुकीसाठी कायदा पालटण्यात आला. आम्ही निवडणूक आयोगाला विचारले होते की, मतदान प्रक्रियेची चित्रीकरण केले जाणार आहे का ? त्यावर आयोगाने नकार दिला आणि त्याने कायद्यातही पालट केला. त्यामुळे कुणालाही वाटले, तरीही ते मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ काढू शकत नाहीत. याचा अर्थ सरळ आहे की, निवडणूक आयोगाने तडजोड केली. निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ आहेत, हे स्पष्ट झाले.