
पुणे – जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगाने शिवार फेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण, गाळायुक्त शिवार या संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी पुणे, तसेच जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक, जिल्हा जलसंधारण अधिकारी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक आदी उपस्थित होते. शिवार फेरीमध्ये प्रत्यक्ष गावात भेट देऊन नोंद असलेल्या अस्तित्वातील मृदा आणि जलसंधारण संरचनांची पडताळणी करून नोंद नसलेल्या मात्र नव्याने आढळलेल्या सर्व रचनांची नोंद घ्यावी. ॲपमध्ये ही माहिती अचूक भरावी. लघुसिंचन योजनांची सातवी प्रगणनाही शिवार फेरीच्या वेळी करून घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण आणि रुंदीकरणांतर्गत प्रस्तावित केलेल्या गाळ काढण्याच्या २२० कामांना संमती द्यावी, ‘अटल भूजल योजने’अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांच्या बळकटीकरणाचे काम हाती घ्यावे, असेही ते म्हणाले. संमती दिलेल्या कामांपैकी १३४ कामे पूर्ण झाली आहेत. ‘जलयुक्त शिवार अभियान २’मध्ये सर्व विभागांच्या मिळून ५६ कोटी ३७ लाख रुपयांच्या ५ सहस्र ४५५ कामांच्या आराखड्याला संमती दिली आहे. अभिसरणातील ४ सहस्र ५५३ कामे पूर्ण झाली असून ५२ कामे चालू आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० दिवस कृती कार्यक्रमाच्या कालावधीत या अभियानाच्या अंतर्गत ५३१ कामांपैकी ३८७ पूर्ण झाली असून उर्वरित कामे चालू आहेत.