वज्रखेडा (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – येथे स्वामी देवानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ७ दिवसीय विश्वकल्याणार्थ पंचकुंडात्मक श्री महारुद्र याग महायज्ञ आणि संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. हा महारुद्र याग महायज्ञ सोहळा १८ ते २५ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये वज्रखेडा परिसरातील जवळपास ६० यजमान हे या महायज्ञामध्ये गायीच्या गावरान १११ लिटर तुपाची आहुती देणार आहेत. याशिवाय १११ किलो तीळ, ५१ किलो ज्वारी, ५१ किलो तांदूळ, ५१ किलो साखर, ११ टन समिधा (सरपण) हे साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. राजस्थानातील विशेष गवतापासून या सोहळ्यासाठी मंडप सिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे विश्व जनकल्याणासाठी आयोजित हा सोहळा अधिक लक्षवेधी ठरत आहे.
या ठिकाणी पंचक्रोेशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दैनंदिन श्री महारुद्र महायज्ञ पूजन विधी, श्री गणेश पूजन, कलश जलयाग, प्रायश्चित आणि यजमानाचे शुद्धीकरण, पंचांग कर्मपूजन अन् मंडळ स्थापना १९ एप्रिल या दिवशी करण्यात आली. संतोष महाराज आढावणे हे प्रतिदिन सकाळी ११ ते दुपारी २ संगीतमय शिवमहापुराण कथा करणार आहेत. दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४.३० ते ५.३०, काकडा भजन, दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन होईल. या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वज्रखेडा ग्रामस्थांनी केले आहे. २० एप्रिल या दिवशी अग्नीस्थापना, ग्रहशांती हवन, महारुद्र हवन पार पडले. २५ एप्रिल या दिवशी पूर्णाहुती सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील.
पिंडीवर २१३ लिटर पंचामृताचा अभिषेक !
वज्रेश्वराच्या पिंडीवर पंचधातूचे आवरण घालण्यात येणार आहे. अभिषेक करण्यासाठी १०१ किलो दही, १०१ किलो दूध, ११ किलो मध लागणार आहे. २१३ लिटर पंचामृताचा अभिषेक आहे. हे पूजन इंदूर येथील ‘अन्नपूर्ण आश्रमा’चे आचार्य श्री. किशोर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा आयोजित करण्यात आला.