जुलैमध्ये पॅरिस (फ्रान्स) येथे ‘जागतिक वारसा’ दर्जाप्राप्तीसाठी मतदान !

भारतातील १२ गड-दुर्गांची माहिती ‘युनेस्को’कडे पाठवली !

मुंबई – ‘जागतिक वारसा’ दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडूमधील १ अशा एकूण १२ गड-दुर्गांची माहिती भारत शासनाकडून ‘युनेस्को’कडे (‘संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थे’कडे) पाठवण्यात आली आहे. ‘जागतिक वारसा’ दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी जगभरातील वास्तूंची नावे ‘युनेस्को’ला प्राप्त झाली आहेत. याविषयी मतदानाची प्रक्रिया जुलै २०२५ मध्ये फ्रान्स देशातील पॅरिस शहरात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून माहिती पाठवण्यात आलेल्या गड-दुर्गांना यांना जागतिक दर्जा प्राप्त होणार का ? याचा निर्णय जुलै मासात होईल, अशी माहिती महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या एका अधिकार्‍यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

‘जागतिक वारसा’ दर्जासाठी जगातील विविध देशांतून आलेल्या नावांना मान्यता देण्याविषयी प्रतिवर्षी जुलै मासात युनेस्कोची बैठक होते. युनेस्कोत सहभाग असलेल्या २१ देशांचे प्रतिनिधी यासाठी मतदान करतात. यामध्ये निवड झालेल्या वास्तूंना ‘जागतिक वारसा’ म्हणून दर्जा दिला जातो. मागील वर्षी युनेस्कोची परिषद भारतामध्ये झाली होती. पॅरिसमध्ये होणार्‍या परिषदेसाठी पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र शासन यांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. ‘जागतिक वारशा’साठी प्रतिवर्षी प्रत्येक देशातून १ प्रस्ताव पाठवता येतो. भारतामधून साल्हेर (नाशिक), प्रतापगड (सातारा), राजगड (पुणे), खांदेरी (रायगड) हे राज्यसंरक्षित गड, तर रायगड (रायगड), सिंधुदुर्ग (सिंधुदुर्ग), विजयदुर्ग (सिंधुदुर्ग), सुवर्णदुर्ग (रत्नागिरी), पन्हाळा (कोल्हापूर), शिवनेरी (पुणे), लोहगड (पुणे) आणि तमिळनाडू येथील जिंजी या गड-दुर्गांची नावे यावर्षी ‘युनेस्को’कडे पाठवण्यात आली आहेत.