निसर्गाचा र्‍हास नव्हे, तर त्याचे संरक्षण झाले पाहिजे ! – आमदार भीमराव अण्णा तापकीर, भाजप

खडकवासला ‘जलाशय रक्षण अभियान’ २३ व्या वर्षीही १०० टक्के यशस्वी !

पुणे, १४ मार्च (वार्ता.) – धूलिवंदनाच्या दिवशी जलाशयाचे संरक्षण होण्याच्या  उद्देशाने गेली २२ वर्षे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून उभे रहातात. धरणाच्या पाण्यात कुणी उतरू नये, तसेच पाण्याचे प्रदूषण होऊ नये यांसाठी समिती निःस्वार्थपणे हे कार्य करत आहे. धरणाचे पाणी प्रदूषणमुक्त रहाण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेली २२ वर्षे प्रयत्न करत आहे. ‘सर्व नागरिकांनी जलस्रोत सुरक्षित रहातील, यासाठी प्रयत्नशील रहावे’, असे आवाहन खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी केले. त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. या वर्षीही मोहीम १०० टक्के यशस्वी होऊन जलाशयातील पाणी प्रदूषणापासून मुक्त राहिले.

वैशिष्ट्यपूर्ण

१. सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांची या वेळी वंदनीय उपस्थिती लाभली.

२. हिंदु जनजागृती समिती सातत्याने करत असलेले प्रबोधन आणि राबवत असलेली मोहीम यांमुळे रंग खेळून येणार्‍यांची संख्या अत्यल्प होती.

३. ‘जलदेवतेचे अस्तित्व आणि कृपाशीर्वाद यांमुळेच हे अभियान यशस्वी झाले’, अशी भावना धर्मप्रेमींनी व्यक्त केली.


हिंदु जनजागृती समिती निःस्वार्थपणे हे कार्य करत आहे. तुम्हाला सहकार्य करणे, हे आमचे कर्तव्यच आहे. – पोलीस अधिकारी

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंग खेळून युवक-युवती खडकवासला जलाशयात उतरल्याने जलाशयाचे प्रदूषण होत असे. हिंदु जनजागृती समितीच्या साधकांनी ‘जलाशय रक्षण अभियान’ राबवले. या अभियानाच्या अंतर्गत रासायनिक रंग खेळून खडकवासला जलाशयात उतरणार्‍या नागरिकांचे प्रबोधन करण्यात येते, तसेच संपूर्ण जलाशयाभोवती मानवी साखळीचे कडे करून जलाशयात उतरणार्‍यांना अटकाव केला जातो. हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ, पोलीस, प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान राबवण्यात आले. या वेळी २०० हून अधिक कार्यकर्ते, जिज्ञासू, धर्मप्रेमी उपस्थित होते. या अभियानासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि हिवरे, सासवड, नसरापूर, शिरवळ, भोर, नवलेवाडी, दौंड, पारगाव, भोसरी, मोशी, तसेच पिंपरी-चिंचवड येथून आलेले धर्मप्रेमी सहभागी झाले होते. हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, तसेच त्यांना धर्मशास्त्र समजावे यांसाठी हिंदु जनजागृती समिती सातत्याने प्रबोधन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे अभियान राबवण्यात आले.

मानवी साखळी करून खडकवासला जलाशयाचे रक्षण करणारे कार्यकर्ते

या वेळी इतिहास अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते, ‘छावा’ चित्रपटाचे पटकथा लेखक श्री. उन्मन बाणकर, खडकवासला मतदारसंघाचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री. सारंग नवले, खडकवासला मतदारसंघाचे भाजपचे उपाध्यक्ष श्री. चेतन मुनी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक रूपेश मते, केतन निकम, मारुति हनमघर, ‘नांदेड सिटी’चे मुख्य संचालक अधिवक्ता नरसिंह लगड, यासह नांदेड विभागाचे श्री. प्रकाश गोरे, अधिवक्ता प्रदीप देशमुख हे उपस्थित होते.

मानवी साखळी करून उभे असतांना भाजपचे आमदार माननीय भीमराव अण्णा तापकीर यांसह अन्य मान्यवर

धर्मप्रेमी, तसेच अभियानामध्ये सहभागी असणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने फिरत्या शौचालयांची सुविधा उपलब्ध करून दिली.


मान्यवरांचे उल्लेखनीय अभिप्राय

श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती – हिंदु जनजागृती समितीचे साधक आणि अन्य संघटनांचे कार्यकर्ते खडकवासला जलाशय रक्षण मोहीम गेली २२ वर्षे राबवत आहेत. हे अभियान १०० टक्के यशस्वी झाले आहे.

श्री. ज्ञानेश देसाई, नागरिक सोशल फाउंडेशन – हिंदु जनजागृती समितीचे साधक पाण्याची हानी होऊ नये, यासाठी प्रत्येक वर्षी खडकवासला जलाशयाभोवती उभे रहातात. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे.

श्री. उन्मन बाणकर, ‘छावा’ चित्रपटाचे पटकथा लेखक – पाण्याच्या प्रदूषणामुळे रोगराई मोठ्या प्रमाणात पसरत आहे. पाणी प्रदूषण होऊ नये, तसेच पुणेकरांचे आरोग्य सुरक्षित रहावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे.

श्री. सचिन घुले – हिंदु राष्ट्र समन्वय समिती पुणे जिल्हा संयोजक – हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. म्हणूनच हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. रंगपंचमीच्या दिवशीही नागरिकांनी या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.

पोलिसांकडून कारवाई !

रंग खेळून दुचाकीवरून ‘ट्रिपल सीट’ जाणार्‍या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली, तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली.