Jaishankar On Indians Deported By US : वर्ष २००९ पासून भारतियांना नियमानुसार परत पाठवण्यात येत आहे !

  • परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी संसदेत दिली माहिती

  • अमेरिकेने बेकायदेशीररित्या रहाणार्‍या १०४ भारतियांना परत पाठवतांना हातात आणि पायात बेड्या घातल्याची घटना

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्‍या १०४ भारतियांना अमेरिकेने त्याच्या सैन्याच्या ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ या विमानातून भारतात पाठवून दिले. हे विमान ५ फेब्रुवारीच्या रात्री पंजाबच्या अमृतसर शहरातील विमानतळावर उतरले. अमेरिकेने परत पाठवलेल्या भारतियांच्या हातात आणि पायात बेड्या घातल्याचे आढळून आले. ४० घंट्यांच्या या प्रवासात त्यांना बेड्या घालण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणी विरोधी पक्षाने सत्ताधारी भाजपवर प्रचंड टीका चालू केली. तसेच ६ फेब्रुवारी या दिवशी संसदेतही गदारोळ केला. संसदेबाहेर आंदोलनही केले. यामुळे संसदचे कामकाज काही वेळ स्थगितही करावे लागले. या प्रकरणी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी राज्यसभेत निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले की, स्थलांतरितांना अशा प्रकारे विमानाने परत पाठवण्याची पद्धत नवी नसून यापूर्वीही हे करण्यात आले आहे. हे नियमानुसार केले जात आले आहे, असे सांगत त्यांनी वर्ष २००९ पासूनची स्थलांतरितांना परत पाठवण्यात आल्याची आकडेवारी वाचून दाखवली.

भारतात परत पाठवण्यात आलेल्या भारतियांपैकी ३० पंजाबचे, हरियाणा आणि गुजरात राज्यांचे प्रत्येकी ३३, तसेच महाराष्ट्र अन् उत्तरप्रदेश राज्यांचे प्रत्येकी ३ आणि चंडीगडच्या २ भारतीय नागरिकांचा समावेश आहे, असेही सूत्रांनी सांगितले; मात्र या संख्येबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. यामध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुले यांचाही समावेश आहे. या सर्वांची पंजाब पोलिसांसह निरनिराळ्या सरकारी संस्थांकडून चौकशी करण्यात येत आहे. कुणाच्या विरोधात गुन्हा नोंद आहे का ?, हे पडताळले जात आहे.


Read This Statement by External Affairs Minister, Dr. S Jaishankar in Lok Sabha (February 6, 2025)


एस्. जयशंकर यांनी सांगितले की,

१. परत पाठवण्याच्या प्रक्रियेची आखणी आणि कार्यवाही ही अमेरिकेच्या ‘इमिग्रेशन अँड कस्टम इनफोर्समेंट’ या विभागाकडून केली जाते. या विभागाकडून विमानाने परत पाठवण्यासाठी ‘सँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर’ ही प्रक्रिया वर्ष २०१२ पासून वापरली जाते.

२. स्थलांतरितांना विमानाने परत पाठवताना बंधनात ठेवण्यात येते; मात्र असे असले, तरी ‘इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट’कडून आपल्याला देण्यात आलेल्या माहितीनुसार महिला आणि मुले यांंवर कोणतीही बंधने घातली जात नाहीत. तसेच परत पाठवले जात असलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी अन्न आणि इतर गरजांची काळजी घेतली जाते.

३. आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवांचाही समावेश असतो. आवश्यकता असल्यास किंवा प्रसाधनगृहात जाण्यासाठी स्थलांतरितांना बंधनातून मुक्त केले जाते. हे नियम नागरी विमान तसेच सैन्याच्या विमानासाठीही लागू आहेत.

४. अमेरिकेने ५ फेब्रुवारी या दिवशी पाठवलेल्या विमानामध्येही यात कोणताही पालट करण्यात आला नव्हता. परत पाठवले जात असतांना भारतीय नागरिकांशी गैरवर्तवणूक होऊ नये, यासाठी आपण अमेरिकेच्या सरकारसमेवत संपर्कात आहोत.