सावंतवाडी – ई-पीक नोंदणीची आयत्या वेळी सक्ती न करता जुन्या सातबाराच्या आधारावर शेतकर्यांना सरसकट फळ पीक विमा योजनेचा लाभ द्या. कुणालाही लाभापासून वंचित ठेवू नका. विम्याचा लाभ देण्यास काही अडचणी असतील, तर आताच सांगा, आपण थेट आयुक्तांशी बोलू; मात्र शेतकरी आणि बागायतदार यांची हानी होणार नाही, याची काळजी घेऊया, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे माहीम, मुंबई येथील आमदार महेश सावंत यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली. ‘एकही शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहिल्यास शिवसेना (ठाकरे गट) पक्ष आंदोलन करेल’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.

फळ पीक विमा योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकर्यांसाठी २२ एप्रिल या दिवशी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार पाटील यांची भेट घेण्यात आली. या वेळी विमा आस्थापनांचे अधिकारी, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार सावंत यांनी या वेळी उपस्थित विमा आस्थापनाच्या अधिकार्यांना खडसावले.
या वेळी तहसीलदार पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्यातील विमा योजनेस पात्र शेतकरी आणि बागायतदार या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी सकारात्मक प्रयत्न करा, अशा सूचना त्यांनी संबंधित विमा आस्थापनांच्या अधिकार्यांना दिल्या.