
पंढरपूर – आषाढी शुक्ल एकादशी सोहळा ६ जुलै या दिवशी होत आहे. या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्यासमवेत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. वारी कालावधीत येणार्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या अनुषंगाने ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर येथे वाखरी पालखी तळ, भक्तीसागर आणि नदीपात्र यांची पहाणी केली.
पालकमंत्र्यांनी नियोजित दर्शन मंडप, ‘स्कायवॉक’ यांविषयीची माहिती घेऊन भक्तीसागर येथे होणार्या नियोजित ‘संत नामदेव स्मारक जागे’ची पहाणी केली. भक्तीसागर येथे मोठ्या प्रमाणात सावली देणारी, पानगळ अल्प असणारी, तसेच अल्प पाण्यात वाढणार्या झाडांची लागवड करावी यांसाठी नियोजन समितीतून निधीची उपलब्धता केली जाईल, असे सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरी तळावर भाविकांसाठी घेण्यात येत असलेल्या सोयीसुविधा यांची माहिती दिली. या प्रसंगी भाजपचे आमदार समाधान आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.