जम्मू-काश्मीरहून ३०० जणांनी केला मंत्रालयातील नियंत्रण कक्षांशी संपर्क !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई, २३ मे (वार्ता.) – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर महाराष्ट्र शासनाकडून जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अद्यापही महाराष्ट्रातील शेकडो नागरिक अडकले आहेत. यामध्ये मुंबईतील २५० हून अधिक नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ३०० हून अधिक नागरिकांनी साहाय्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रा’शी संपर्क साधला आहे, अशी माहिती केंद्राचे व्यवस्थापक विशेषकर सूर्यवंशी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण किती पर्यटक अडकले आहेत ? याविषयी अद्याप पूर्ण माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला प्राप्त झालेली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्रातून किती पर्यटक गेले ? याची माहिती मिळण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स, तसेच जिल्हा प्रशासनासमवेत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे अधिकारी संपर्कात आहेत. जम्मू-काश्मीर यांना जोडणार्‍या रामबन येथील राष्ट्रीय मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे मागील २-३ दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे  नागरिकांना महाराष्ट्रात आणण्यात अडचण येत आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे अधिकारी जम्मू-काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.