काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणाचे गोव्यात तीव्र पडसाद

पणजी, २३ एप्रिल (वार्ता.) – काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर २४ एप्रिल या दिवशी मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. २४ एप्रिल या दिवशी मी कुठेही वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध असणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २३ एप्रिल या दिवशी मंत्रालयामध्ये पत्रकारांना दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे २४ एप्रिल या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मडगाव, पणजी आणि म्हापसा येथील भाजप कार्यालयांमध्ये, तसेच सायंकाळी सांखळी येथील रवींद्र भवन येथे उपलब्ध रहाणार होते. हे सर्व कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी रहित केले आहेत.
काजू महोत्सव पुढे ढकलला
आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ २५ ते २७ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेला काजू महोत्सवही पुढे ढकलण्यात आला आहे. पणजी येथील दयानंद बांदोडकर मैदानात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र आता हा महोत्सव रहित झाला असून लवकरच नवीन दिनांक घोषित केला जाणार असल्याची माहिती वन विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आली.
आतंकवादी आक्रमणाचा भाजपकडून निषेध
पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर झालेल्या आक्रमणाचा प्रदेश भाजपने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, ‘‘मोदींच्या राजवटीत काश्मीरची झालेली प्रगती थांबवण्यासाठी शत्रू सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे शत्रूंचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे आणि या लढाईत पाठिंबा द्यावा.’’
![]() पणजी – पहलगाम येथे जे ठिकाणी आतंकवादी आक्रमण झाले, त्या ठिकाणाहून गोव्याची ३ दांपत्ये केवळ १५ मिनिटांपूर्वी निघाल्याने वाचली. जम्मू-काश्मीरमध्ये २६ गोमंतकीय अडकले आहेत; मात्र सर्वजण सुखरूप आहेत. राज्य सरकारची यंत्रणा त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांना अवश्यक ते साहाय्य पुरवले जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. २३ एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर गोव्यातील सर्व पर्यटनस्थळांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि पोलिसांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.’’ |