पुणे शहरातील २०१ ठिकाणे पावसाळ्यात धोकादायक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – पावसाळ्यात शहरात २०१ ठिकाणे पाणी तुंबून धोकादायक होतात, त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना चालू केल्या आहेत. ही कामे २१ मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत पाणी तुंबणार्‍या जागांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, मलनिःसारण विभाग, क्षेत्रीय कार्यालये आणि पोलिसांकडून शहरातील पाणी तुंबणार्‍या ठिकाणांची सूची सिद्ध करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेत महापालिकेला निधी मिळाला आहे, त्यातून जी कामे चालू आहेत. त्यामध्ये २०१ पैकी २१ ठिकाणांचा समावेश आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेतून सध्या ६६ ठिकाणी कामे चालू आहेत. अनेक ठिकाणी पावसाळी गटार टाकणे, पावसाळी बॉक्स गटार टाकणे ही कामे चालू आहेत. यातील काही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, तर काही कामे पूर्ण होणार नाहीत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांनी दिली.