
बेळगाव – बीदर आणि शिमोगा येथे ‘सीईटी’ परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्याचे यज्ञोपवीत (जानवे) परीक्षा अधिकार्यांनी काढल्याची घटना घडली आहे. तरी या प्रकरणी ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्याचे यज्ञोपवीत (जानवे) काढणार्या अधिकार्याला त्वरित निलंबित करावे आणि त्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ब्राह्मण समाजाने मोर्चा काढला. या मागणीसाठी कित्तूर चन्नम्मा चौक येथे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले, तसेच जानवे हाती धरून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
कर्नाटक शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ब्राह्मण व्यक्तीला यज्ञोपवीत बदलण्यासाठी विशिष्ट नियम आणि परिस्थिती असतात. त्यामुळे ही घटना म्हणजे ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे कृत्य आहे. ‘सीईटी’ परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांचे जानवे काढणे, हे अत्यंत निंदनीय आहे. ‘सीईटी’कडून अशा प्रकारे कुठलीही मार्गदर्शक सूचना घोषित केलेली नाही. त्यामुळे हे कृत्य म्हणजे ब्राह्मणांच्या संविधानिक अधिकारांवर घाला आहे. ब्राह्मण समाज हा शांतताप्रिय असून अशा घटना होऊ नयेत, यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी अन् संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी समाजाची मागणी आहे.’’
या प्रसंगी भाजपचे आमदार अभय पाटील यांनी ते संपूर्ण ब्राह्मण समाजाच्या पाठीशी उभे असून या प्रकरणी सरकारला याचा जाब विचारणार आहोत, अशी ग्वाही दिली. जयतीर्थ सौंदत्ती यांच्यासह अनिल पोतदार यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. या वेळी ‘चित्पावन ब्राह्मण संघा’चे श्री. संदीप भिडे, ‘समर्थ सोसायटी’चे अध्यक्ष श्री. अजय सुनाळकर यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच उपाध्यक्ष श्री. अभय जोशी, श्री. भारत देशपांडे, बांधकाम व्यावसायिक श्री. चैतन्य कुलकर्णी, श्री. प्रकाश बापट, माजी नगरसेविका ज्योती देशपांडे, अशोक देशपांडेही उपस्थित होते.