पहलगाम आतंकवादी आक्रमणाचा राज्यभरातून निषेध !

मुंबई – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात  महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध पद्धतीने निषेध करण्यात येत आहे. सामाजिक माध्यमातून प्रतिष्ठित व्यक्ती, अभिनेते याचसमवेत सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवून मृतांना श्रद्धांजली वहात आहेत.

सोलापूर आणि परभणी येथे उद्धव ठाकरे गटाकडून, पालघर आणि धुळे येथे शिवसेनेकडून, तसेच मुंब्रा येथे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या आक्रमणाच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. कोल्हापूर आणि रत्नागिरी येथेही या  आक्रमणाच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली.

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या कालावधीत जम्मू-काश्मीर येथे ठाणे येथील एकूण ४० पर्यटक गेले होते. डोंबिवली येथील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने, पनवेल येथील दिलीप देसले, पुणे येथील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा यात मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील अन्य ३७ पर्यटक सुखरूप आहेत. या सर्व प्रवाशांना आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.


  • संजय लेले आणि दिलीप देसले यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर आल्यावर भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. डोंबिवली येथील पर्यटकांचे पार्थिव भागशाळा मैदानात ठेवण्यात येणार आहेत.
  • या घटनेचे साक्षीदार असलेले पनवेलचे सुबोध पाटील या पर्यटकाने सांगितले की, ते चहाच्या टपरीत लपले होते. त्यामुळे त्यांचा जीव वाचला, त्यांच्या मानेला चाटून गोळी गेली.
  • मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, स्थानिक आमदार आणि खासदार, तसेच विविध स्तरांवरील प्रशासकीय अधिकारी यांनी मृतांच्या नातेवाइकांना आवश्यक ते सर्व साहाय्य करण्याविषयी संबंधित यंत्रणांना सूचित केले. ते पहलगाम ते डोंबिवली यामधल्या प्रवासात पर्यटकांचे मृतदेह सुरक्षित येण्यासाठी लक्ष ठेवून होते.

भारत सरकारने पाकिस्तानला ‘जशास तसे’ उत्तर द्यावे ! – शिवसेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची संतप्त निदर्शनांद्वारे मागणी

कोल्हापूर येथे निषेध आंदोलन करतांना शिवसेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्हापूर, २३ एप्रिल (वार्ता.) – भारत सरकार पाकिस्तानच्या संदर्भात आता काय भूमिका घेणार आणि हिंदूंना ते कशा प्रकारे न्याय देणार ? याची आम्ही वाट पहात आहोत. ज्या प्रकारे ‘हिंदु आहे का ?’, अशी विचारणा करून गोळ्या घालण्यात आल्या त्याच प्रकारे आम्हालाही आता तसेच विचारण्याची वेळ आली आहे. हिंदूंनी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे आता आंदोलन वगैरे करण्यापेक्षा भारत सरकारने ‘जशास तसे’ उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे परखड मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी व्यक्त केले. शिवसेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे संतप्त निदर्शने करण्यात आली. त्या वेळी त्यांनी ही मागणी केली. आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाचा निषेध म्हणून २५ एप्रिल या दिवशी ‘कोल्हापूर बंद’ची घोषणा करण्यात आली.

या वेळी पाकिस्तानचा ध्वज फाडून, तसेच तो पायाखाली तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी ‘एक धक्का और दो पाकिस्तान जला दो’, अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे म्हणाले, ‘‘त्यांनी जर धर्म विचारून कृती केली, तर आम्ही पण आता धर्म विचारूनच कृती करून उत्तर देऊ. कोल्हापूर येथे आता एकाही बांगलादेशी घुसखोरांना आम्ही राहू देणार नाही.’’ या प्रसंगी ‘हिंदु एकता’चे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. संभाजी (बंडा) साळुंखे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे आणि श्री. उदय भोसले, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, श्री. अवधूत भाट्ये यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य ठिकाणी झालेली आंदोलने 

१. कोल्हापूर येथील बिंदू चौक येथे ‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने पाकिस्तानचा भव्य झेंडा सिद्ध करून त्याच्यावरून लोकांनी चालून, चारचाकी-दुचाकी गाड्या नेऊन निषेध व्यक्त केला.

अर्ध शिवाजी महाराज पुतळा चौक येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख श्री. रवीकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने

२. अर्ध शिवाजी महाराज पुतळा चौक येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख श्री. रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी श्री. रविकिरण इंगवले म्हणाले, ‘‘ज्याप्रकारे इस्रायल येथे तेथील नागरिकांना संरक्षणासाठी शस्त्रे दिली आहेत. त्याप्रकारे भारतातील हिंदूंना आता संरक्षणासाठी शस्त्रे देण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर शहरात अनेक तालिमी असून मी प्रत्येक तालिमीला एकेक रणगाडा द्यावा, प्रत्येक तालिमीला शस्त्रसाठा द्यावा, अशी मागणी करतो. असे झाल्यास भारतात जिहाद्यांकडून चालू असलेल्या गृहयुद्धास ‘जशास तसे’ उत्तर मिळेल.’’


डोंबिवलीत जोरदार निषेध !

डोंबिवली येथे शिवसेना, मनसे, विविध सामाजिक संघटना, हिंदु संघटना, नागरी संस्था यांनी डोंबिवली, कल्याण शहरांमधील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर येऊन काळ्या फिती लावून आतंकवादी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध केला. ‘आपल्या कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू झाला आहे’, या भावनेतून डोंबिवलीकर वावरत होते. डोंबिवली शहरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. डोंबिवली येथील शिक्षण संस्था, अधिकोष, वित्तीय संस्था यांनी त्यांच्या संस्थांच्या प्रवेशद्वारावर फलक लावून पहलगाममधील घडलेल्या घटनेचा निषेध केला. डोंबिवली नागरी सहकारी अधिकोषाच्या कर्मचार्‍यांनी हातात फलक घेऊन निषेध केला. डोंबिवली येथील टिळकनगर शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक यांनी आक्रमणाचा तीव्र शब्दात निषेध केला. ‘हे आक्रमण भारत विसरणार नाही’, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. पुण्यातही या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

संपादकीय भूमिका

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे आतंकवादी आक्रमणाविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !