हत्तीच्या आक्रमणात शेतकर्याचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

दोडामार्ग – तालुक्यातील मोर्ले गावात हत्तीने एका शेतकर्याचा बळी घेतल्यानंतर या परिसरात हत्ती पकडा मोहीम राबवण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न चालू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर २२ एप्रिलला प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी मोर्ले गावाला भेट दिली आणि घडलेल्या घटनेची माहिती घेतली.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोर्यात हत्तींचा उपद्रव चालू आहे. हे हत्ती शेती आणि बागायती यांची हानी करत आहेत. हत्तींच्या भीतीने शेती, बागायतींमध्ये जाणे शेतकर्यांनी बंद केले आहे. हत्तीने एका शेतकर्याचा बळी घेतल्यानंतर राज्य सरकारने ‘हत्ती पकडा’ मोहीम राबवण्याचा आदेश दिला आहे; मात्र या भागात हत्तींचा एक कळपही आहे. त्या हत्तींचे काय करणार ? असा प्रश्न विचारला जात आहे.
मुंबई येथून आलेले प्रधान मुख्य वनसंरक्षक बेन यांनी या भागाला भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत सिंधुदुर्ग जिल्हा उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, दोडामार्ग वन परिक्षेत्र अधिकारी वैशाली मंडल आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. बेन यांनी मोर्ले गावात हत्तीच्या आक्रमणात मृत्यू झालेल्या शेतकर्याच्या कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केली. मृत शेतकर्याच्या कुटुंबाला हानी भरपाईची उर्वरित रक्कम लवकर दिली जाणार आहे, असे बेन यांनी सांगितले. ‘हत्ती पकडा’ मोहीम राबवण्याच्या दृष्टीने हालचाली चालू आहेत. स्थानिक शेतकर्यांशी या मोहिमेविषयी चर्चा करून नंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे बेन यांनी सांगितले.