
आळंदी, २३ एप्रिल (वार्ता.) – पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे अनधिकृत बालगृहे, वसतीगृहे, अनाथाश्रम चालवले जात असल्याची बातमी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाली होती. आळंदीमध्ये गेल्या काही वर्षांत आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये लैंगिक शोषण झाल्याविषयी गुन्हा नोंद झाला होता. प्रसिद्धीमाध्यमे आणि स्थानिक आळंदीकर यांनी या विरोधात आवाज उठवला होता. या बातमीची नोंद महिला आणि बाल विकास आयुक्त नयना अर्जुन गुंड यांनी घेतली. त्यांनी अनाथालये, बालगृहे आणि वसतीगृहे यांतून चालणारे गैरप्रकार, बालकांचे लैंगिक शोषण गंभीर असल्याने याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी अन् ‘चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री’ क्रमांक १०९८ वर संपर्क करण्याचे नागरिकांना आवाहन निवेदनाद्वारे केले आहे. आपल्या परिसरातील अनधिकृत संस्थांची माहिती कळवण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.