सुपे (पुणे) येथे ३० वर्षांपासून भूसंपादनाच्या मोबदल्याअभावी शेतकर्‍यांकडून आंदोलनाची चेतावणी !

जलसंपदा अधिकार्‍यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे

सुपे (पुणे) – गेली ३० वर्षांपासून राबवण्यात येत असलेल्या ‘जनाई उपसा जलसिंचन योजने’साठी भूसंपादित करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत. वारंवार मागणी करूनही शेतकर्‍यांना पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. येत्या १५ दिवसांत शासनाने नोंद न घेतल्यास आंदोलन करण्याची चेतावणी पीडित शेतकर्‍यांच्या वतीने कृती समितीने दिली आहे. (वारंवार पैशाची मागणी करूनही पैसे न मिळणे याला उत्तरदायी असणार्‍यांवरच कारवाई करायला हवी ! – संपादक)

१. ३० वर्षांपासून ‘जनाई’चा कालवा, चारा-पोटचारा यांच्यासाठी शेतकर्‍यांची भूमी संपादित केलेली आहे.

२. भूमी संपादित करतांना जागा संपादित केलेल्या भूमीचा मोबदला (पैसे) देण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले होते.

३. भूसंपादनाचे पैसे मागण्यासाठी जलसंपदा विभागाच्या कार्यालयामध्ये शेतकर्‍यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात, असा शेतकर्‍यांचा आरोप आहे. (अशा अधिकार्‍यांवर कारवाई का केली नाही ? हे जनतेला समजले पाहिजे ! – संपादक)

४. कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे म्हणाले, ‘अधिकार्‍यांनी कृती समितीने दिलेल्या १२ मागण्यांचा प्रस्ताव संमत केला; मात्र प्रत्यक्षात केवळ २ मागण्या पूर्ण केल्या असून १० मागण्या अजनूही प्रलंबित आहेत.’