मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

विधान परिषद प्रश्नोत्तरे…

उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, २७ जुलै (वार्ता.) – मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षितेसाठी उपाययोजना करण्यात येणार असून सफाई कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २६ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली. सदस्य भाई गिरकर यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री सामंत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाहन विराजित यंत्रसामग्रीच्या साहाय्याने यांत्रिक पद्धतीने मलनिःसारण वाहिन्यांचे परिरक्षण करण्यात येते, तसेच मोठ्या नाल्याची स्वच्छता प्रामुख्याने यंत्रसामग्रीचा वापर करून करण्यात येते; परंतु ज्या ठिकाणी यंत्रसामग्री वापरता येणे शक्य नाही, अशा पर्जन्य जलवाहिन्यांची स्वच्छता अपवादात्मक परिस्थितीत कंत्राटदारांच्या वतीने नियुक्त केलेल्या कामगारांच्या साहाय्याने सुरक्षिततेचे उपाय करून करण्यात येते. महानगरपालिकेतील २९ सहस्र ७०० सफाई कामगारांपैकी ५ सहस्र ५९२ सफाई कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार सेवासदनिकांचे वाटप करण्यात आले आहे, तसेच सफाई कामगारांच्या वसाहतीच्या भूखंडावर आश्रय योजनेंतर्गत पुनर्विकास करून १२ सहस्र घरे बांधण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या वतीने चालू आहे.