शीख, जैन, बौद्ध यांनी ‘हिंदु’ आहोत, हे समजून घ्यायला हवे ! – कर्नल करतार सिंह मजीठिया, कृपाल रूहानी फाऊंडेशन, गोवा

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ पंचम दिवस – मान्यवरांचे विचार

विद्याधिराज सभागृह, २० जून (वार्ता.) – कोणताही महात्मा जगात येऊन धर्म निर्माण करत नाही. प्रभु श्रीराम, गुरुनानक, गुरुगोविंदसिंह यांनी कोणताही धर्म निर्माण केला नाही. धर्माचे ठेकेदार असतात, ते धर्म निर्माण करतात. विश्‍वात केवळ हिंदु धर्मच आहे. जैन, बौद्ध, शीख हे हिंदु आहेत. आमचे पूर्वज हिंदूच होते. माझ्या आजोबांनी शीख पंथ स्वीकारला. आपले अस्तित्व आपण समजून घ्यायला हवे. आपल्याला बलवान व्हावे लागेल. आपल्या मुलांना आपला इतिहास सांगावा लागेल. जालीयनवाला बागेत गोळीबार करून सहस्रावधींची हत्या करण्याचा आदेश देणार्‍या जनरल डायर याला क्रांतीवीर उधमसिंह यांनी इंग्लंडमध्ये जाऊन ठार मारले. शीख कुणाला सोडत नाहीत. अशी मानसिकता हिंदूंमध्येही असायला हवी.

कर्नल करतार सिंह मजीठिया

धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंना कुणावरही अवलंबून रहाता येणार नाही. हिंदु धर्म आणि मंदिरे यांवर आक्रमण करणार्‍यांना हिंदूंनी सोडू नये. हिंदूंनी कुणावर आक्रमण करू नये; मात्र स्वत:च्या रक्षणासाठी हिंदूंना सिद्ध रहायला हवे, असे वक्तव्य कृपाल रूहानी फाऊंडेशनचे कर्नल करतार सिंह मजीठिया यांनी केले.