महाराष्ट्रातील गायब झालेल्या ५३५ मुलींच्या तस्करीची शक्यता ! – सौ. रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

सौ. रूपाली चाकणकर

ठाणे – ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या माध्यमातून केरळ येथील सहस्रावधी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना आखाती देशांत नेण्यात आल्याच्या घटनेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. महाराष्ट्रात वर्ष २०२२ मध्ये गायब झालेल्या ५३५ महिला आणि मुली यांतीलही काहींची तस्करी झाल्याची शक्यता आहे, अशी भीती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे. (आयोगाने केवळ भीती व्यक्त न करता तातडीने कृतीशील पावले उचलून महिला आणि युवती यांना सुरक्षित वातावरण लाभण्यासाठी प्रयत्न करावेत ! – संपादक)

ठाणे येथे महिलांच्या समस्यांविषयी राज्य महिला आयोगाच्या वतीने जनसुनावणी घेण्यात आली. या सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना सौ. रूपाली चाकणकर यांनी वरील भीती व्यक्त केली.

या वेळी सौ. रूपाली चाकणकर म्हणाल्या, ‘‘काही दलाल नोकरीचे आमीष दाखवून महिला आणि मुली यांना आखाती देशात नेतात. तिथे त्यांच्याकडील भ्रमणभाष, कागदपत्रे काढून घेतली जातात. पुणे येथे अशीच एक घटना घडली. त्या मुलीचे पालक मला भेटले, तेव्हा हा प्रकार लक्षात आला. कोरोनाच्या कालावधीत दळवळणबंदीच्या वेळी घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे आर्थिक ताण निर्माण झाला. काही महिला आणि मुली यांना नोकरीनिमित्त घराबाहेर पडावे लागले. या वेळी काही दलालांनी त्यांना नोकरीचे आमीष दाखवले. या दलालांनी त्यांना आखाती देशात नेले.’’

संपादकीय भूमिका

  • एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली गायब होत असतांना त्यांना शोधण्यासाठी सुरक्षायंत्रणांनी काय प्रयत्न केले, तेही जनतेसमोर यायला हवे !
  • याविषयी सखोल चौकशी करून सरकारने सत्य उघड करावे !