२ सहस्र रुपयांच्या नोटांमुळे काळा पैसा वाढला असल्याने त्या बंद कराव्यात !

भाजपचे खासदार सुशील मोदी यांची मागणी

भाजपचे खासदार सुशील मोदी

नवी देहली – अमेरिका, चीन, जपान अशा विकसित देशांमध्ये कुठेही १०० च्या पुढील चलन नाही; मग भारतात २ सहस्र रुपयांच्या नोटेची आवश्यकता काय ? भारतात १ सहस्र रुपयांची नोट बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता २ सहस्र रुपयांच्या नोटेची आवश्यकता नाही. २ सहस्र रुपयांच्या नोटांमुळे काळा पैसा वाढत आहे, असा दावा भाजपचे राज्यसभेचे खासदार सुशील मोदी यांनी केली. त्यांनी २ सहस्र रुपयांच्या नोटा बंद करण्याचीही मागणी केली.

१. सुशील मोदी म्हणाले की, ज्या लोकांकडे २ सहस्र रुपयांची नोट आहे त्यांना बँकेतून त्या नोटा पालटण्याची सुविधा द्यावी आणि ठराविक कालावधीनंतर बाजारातून २ सहस्र रुपयांच्या नोटा बंद कराव्यात.

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा नष्ट करण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर ५०० रुपयांची नव्या स्वरूपातील नोट आणि २ सहस्र रुपयांची नवी नोट काढण्यात आली होती. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, काही काळाने भारतीय रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा छापणे बंद केले.