हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु राष्ट्रात ‘द्रष्टापुरुष’ म्हणून ओळखले जातील ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स (संगम) २०२१’ परिसंवादात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांची हिंदु राष्ट्राची संकल्पना’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !

स्वातंत्र्यवीर सावरकर
श्री. चेतन राजहंस

जयपूर (राजस्थान) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदु’ शब्दाची व्याख्या सांगून त्याची व्याप्तीही सांगितली. काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णाद्धार, राममंदिराची निर्मिती आणि कलम ३७० हटवणे, या घटनांवरून डॉ. हेडगेवार यांना अपेक्षित असलेला ‘सांस्कृतिक हिंदु राष्ट्रवाद’ आणि सावरकर यांना अपेक्षित असलेला ‘राजकीय हिंदु राष्ट्रवाद’ सत्यात उतरतांना दिसत आहे. भारतीय संसदेत आणि निवडणुकांमध्येही ‘हिंदु राष्ट्रा’चा उल्लेख होत आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी आणि नंतरही सावरकर यांनी जे जे सांगितले, ते खरे झाले. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु राष्ट्रात ‘द्रष्टापुरुष’ म्हणून ओळखले जातील, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते ‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स २०२१’ या ‘ऑनलाईन’ परिसंवादात २६ डिसेंबर या दिवशी झालेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांची हिंदु राष्ट्राची संकल्पना’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते.

जयपूर येथील श्री. निधीश गोयल यांच्या ‘जम्बू टॉक्स’ या यू ट्यूब वाहिनीवर २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत विविध विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात लेखक आणि स्तंभलेखक श्री. प्रणय कुमार यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. श्री. निधीश गोयल यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

देश आणि संस्कृती यांवर घाला घालणार्‍यांविषयी अभिमान बाळगणार्‍यांनी चिंतन करण्याची आवश्यकता ! – प्रणय कुमार, लेखक आणि स्तंभलेखक

भारत ही अशी भूमी आहे, जिथे प्रत्येक १०० वर्षांनी एखादा संत, नेता किंवा महापुरुष जन्म घेतो, जो विखुरलेल्या हिंदूंना एकत्र करून भटकलेल्या हिंदूंना मुख्य धारेत घेऊन येतो. जगातील कोणत्याही भाषा आणि संस्कृती यांमध्ये धर्मापर्यंत पोचण्याची समज नव्हती. अन्य पंथीय एक ईश्वर मानणार्‍या आहेत. याउलट हिंदु धर्माने व्यापकतेला जीवन आणि मृत्यूला संकुचितता मानले आहे. आपण ज्या देशात रहातो, अर्थार्जन करतो आणि तेथील सुविधांचा उपभोग घेतो, त्या देशाप्रती निष्ठा असलीच पाहिजे. त्यामुळे देश आणि संस्कृती यांवर घाला घालणार्‍यांविषयी जे अभिमान बाळगतात, त्यांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उल्लेख केलेल्या हिंदु राष्ट्रात धर्मनिरपेक्षता नाही, तर पंथनिरपेक्षता सांगितली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अद्भुत कार्य पाठ्यपुस्तकांद्वारे आजच्या पिढीपर्यंत पोचवणे, हे आपले दायित्व ! – चेतन राजहंस

जगात ‘स्वाभिमानी हिंदु’ म्हणून वावरण्यासाठी भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला पाहिजे’, असे सावरकर यांनी म्हटले होते. त्यांच्या मनातील भारत ‘हिंदु राष्ट्र का नाही ?’, हा प्रश्न आजच्या युवा पिढीच्या मनातही असला पाहिजे. क्रांतीपुरुष, साहित्यकार, महाकवी, भाषाशुद्धीचे प्रचारक म्हणून असलेले सावरकर यांचे कार्य समाजापर्यंत पोचलेले नाही. त्यांचे हे अद्भुत कार्य पाठ्यपुस्तकांद्वारे आजच्या पिढीपर्यंत पोचवणे, हे आपले दायित्व आहे.