स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित विक्रम सावरकर हे सध्या करत असलेल्या विविधांगी कार्याविषयीची माहिती येथे देत आहोत.

विशेष सदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल ! – संपादक
१. श्री. रणजित विक्रम सावरकर यांचा संक्षिप्त परिचय
अ. कार्याध्यक्ष : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
आ. कार्यवाह : ‘सावरकर सेवा समिती’ संचालित ‘महाराष्ट्र मिलिटरी स्कूल’, मुरबाड, जिल्हा ठाणे
इ. प्रकाशक आणि मुद्रक : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’
ई. अध्यक्ष : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन
उ. लेखक : ‘मेक शुअर गांधी इज डेड’ इंग्रजी पुस्तक
२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रभक्तीचे विचार आणि संस्कृती यांना आधार देण्याचे कार्य
राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिकीकरण, विज्ञाननिष्ठा या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांसह त्यांचे सर्वसमावेशक हिंदुत्वाचे विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत पोचवण्यासाठी श्री. रणजित सावरकर अतिशय जोमाने कार्य करत आहेत. श्री. रणजित सावरकर यांनी प्रगत आणि सुनियंत्रित प्रशासनातून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’ची यशस्वी धुरा गेल्या एक दशकांहून अधिक काळ सांभाळली आहे. उच्चशिक्षित आणि नेतृत्वक्षमतेने परिपूर्ण असे त्यांचे व्यक्तीमत्त्व असून अनोखी शिस्त अन् कामाप्रती कमालीचे समर्पण हे त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना अधिक प्रगल्भतेने सादर करतांना भाषेवरील त्यांची जबरदस्त पकड जाणवते. त्यामुळेच अनेकांसाठी ते प्रेरणा आणि आशेचा स्रोत ठरले आहेत. विज्ञाननिष्ठा, विद्याविस्तार यांतून त्यांनी स्वातंत्र्यविरांचे विचार सर्वदूर नेले आहेत. एका सर्जनशील व्यक्तीमत्त्वातून राष्ट्रभक्तीच्या विचारांच्या संस्कृतीला आधार देण्याचे कार्यही त्यातून त्यांनी साध्य केले आहे. श्री. रणजित सावरकर हे देशभरातील अनेक संस्था आणि संघटना यांच्या व्यासपिठावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह स्वतःचे विचार व्यक्त करतांना दिसतात. देश-विदेशातील प्रसारमाध्यमांच्या चर्चासत्रात सहभागी होऊन हिरीरीने प्रतिआक्रमण करतांना आक्रमक झालेले दिसून येतात. त्यामुळे सावरकरांविषयी नाहक अपकीर्ती करणार्यांच्या मनात त्यांच्याविषयीची वैचारिक दहशत दिसून येते. ही गोष्ट सावरकर यांच्या अनुयायांना सुखावणारी असून तात्यारावांचा अभ्यासपूर्ण आणि आक्रमक विचारांचा वारसा त्यांच्यातून प्रतीत होतांना दिसतो.
३. ‘मेक शुअर गांधी इज डेड’ हे इंग्रजी पुस्तक अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय
श्री. रणजित सावरकर यांनी अलीकडेच ‘मेक शुअर गांधी इज डेड’ हे इंग्रजी भाषेतील पुस्तक लिहिले आहे, ज्यामध्ये गांधींच्या हत्येशी संबंधित अन्वेषण आणि न्यायव्यवस्था यांच्यातील त्रुटींचा शोध घेण्यात आला आहे.
या पुस्तकात दिलेली सर्व तथ्ये न्यायालयात दिलेल्या पुराव्यांवर आधारित आहेत. हे पुस्तक अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाले आहे. त्यांनी बेंगळुरू येथील हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. विक्रम संपत यांच्या ‘द इकोज फ्रॉम द फरगॉटन पास्ट’ आणि ‘कॉन्टेस्टेड लेगसी’ या वीर सावरकर यांच्यावरील ‘बेस्ट सेलर’ (चांगली विक्री होणारे) पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले आहे.
४. श्री. रणजित सावरकर आदिवासी भागात आणि खेडोपाड्यांत करत असलेले सामाजिक कार्य
सर्वार्थाने सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक असणारे कार्य आणि त्या अनुषंगाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेले सैद्धांतिक विचार कृतीशीलतेतून अत्यंत कुशलतेने साकारण्याचे कार्य सध्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर करत आहेत. शासकीय ध्येयधोरणांना पाठबळ देण्यासाठी तळागाळात त्यांचे कार्य चालू आहे.
अ. आजच्या पिढीला नेमके काय हवे आहे, याचा विचार करत, तसेच आधुनिकतेची कास धरत त्यांनी विभिन्न उपक्रमांना प्राधान्य दिले. आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘रायफल रेंज’, सुसज्ज आणि अद्ययावत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाची निर्मिती श्री. रणजित सावरकर यांच्या पुढाकाराने झाली आहे.
आ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय आणि रोखमुक्त व्यवहारांना चालना देण्याच्या अभियानाला प्रतिसाद देत श्री. रणजित सावरकर यांनी आदिवासीबहुल मुरबाड तालुक्यातील धसई गावात प्रयत्न चालू केले आणि धसई हे भारतातील पहिले ‘रोखमुक्त’ गाव ठरले. १ डिसेंबर २०१६ या दिवशी तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. धसई गावापासून स्फूर्ती घेऊन जवळच्या टोकावडे गावातही रोखमुक्त व्यवहारांना प्रारंभ झाला आहे. यासाठी श्री. रणजित सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून या भागातील आदिवासी मुलांना ‘ए.टी.एम्. कार्ड’चा वापर करायला शिकवले.
ही प्रक्रिया आजही चालू असून आजूबाजूची ३५ हून अधिक खेडी ‘रोखमुक्त’ व्यवहाराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या उपक्रमाचे पुढचे पाऊल, म्हणजे आदिवासी विभागात चालू झालेली ‘पहिली स्वयंचलित बँक’. बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने चालू झालेल्या बँकेचे उद्घाटन समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
इ. नेमबाजी, धनुर्विद्येसह कराटे, तायक्वांदो असे स्वसंरक्षणाचे अनेक उपक्रम, अत्याधुनिक व्यायामशाळा हे श्री. रणजित सावरकर यांच्या प्रयत्नांतून साकारलेले उपक्रम.
दूरदृष्टी, नवनवीन संकल्पना, कार्यतत्परता, चिकाटी, कार्यसिद्धीस नेण्याची धडपड यांमुळे येणार्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिसर्या पिढीतील या नेतृत्वाकडून सगळ्यांनाच पुष्कळ अपेक्षा आहेत.
५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आणि साहित्य संपदा प्रसारित होण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न
अ. अत्याधुनिक ‘वॉल मॅपिंग’ तंत्रज्ञानावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर’ या देशातील पहिल्या कायमस्वरूपी आणि व्यक्तीचित्रणात्मक ‘लाईट अँड साऊंड शो’च्या निर्मितीतही त्यांचा अतिशय मोलाचा सहभाग आहे. अंदमान विभागातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित क्रांतीकारकांच्या स्मृती संग्रहालयाच्या उभारणीला लवकरच प्रारंभ होणार आहे. यामध्ये सावरकर यांची सेल्युलर जेलमधील कोठडीची, तसेच कोलूची प्रतिकृती निर्माण करण्यात येणार आहे. मुंबईत येणार्या प्रत्येकाला सावरकर स्मारकाला भेट दिल्याविना परत जावेसे वाटू नये, यासाठी हे त्यांचे सारे प्रयत्न आहेत.
आ. ‘सावरकरस्मारक डॉट कॉम’ या संकेतस्थळाची निर्मिती त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मराठी आणि इंग्रजी भाषेतील साहित्य संपदा नि:शुल्क उपलब्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांचे साहित्य १२ भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले असून ते स्मारकाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. आता ‘ब्रेल लिपी’तही सावरकर साहित्य उपलब्ध आहे. आतापर्यंत या संकेतस्थळाला साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली असून पावणेतीन लाखांहून अधिक लोकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य ‘डाऊनलोड’ केले आहे.
६. ‘महाराष्ट्र मिलिटरी स्कूल’मधील अत्याधुनिक सुविधा आणि शाळेला मिळालेले यश
श्री. रणजित सावरकर यांचे वडील कै. विक्रम नारायण सावरकर यांनी स्थापन केलेल्या मुरबाड येथील ‘महाराष्ट्र मिलिटरी स्कूल’चे ते संचालक आहेत. सैन्यदलासाठी सक्षम, शूर, धाडसी, काटक विद्यार्थी घडवणे, ही या शाळेची प्राथमिकता आहे. शाळेत ‘डिजिटल क्लास रूम’, संगणक कक्ष, उत्तम प्रयोगशाळा, ग्रंथालय तर आहेच; पण खेळासाठी मैदाने आहेत, हॉकीसाठी ‘टर्फ’ (आधुनिक मैदान) आहे.
गेली सलग ३ वर्षे ‘महाराष्ट्र मिलिटरी स्कूल’ने हॉकी क्षेत्रातील नामांकित ‘ध्यानचंद ट्रॉफी’वर स्वतःचे नाव कोरले आहे. याखेरीज अनेक खेळात शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर शाळेचे प्रतिनिधीत्व केले आहे.
७. श्री. रणजित सावरकर यांचे अन्य कार्य
अ. श्री. रणजित सावरकर यांनी कारकीर्दीच्या प्रारंभी त्यांनी ‘महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन लिमिटेड’मध्ये ‘साहाय्यक प्रबंधक’ म्हणून काम केले.
आ. आपद व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी यांच्यात थेट व्हिडिओ संपर्क व्हावा, यासाठी स्थापन केलेल्या उपग्रह संपर्क यंत्रणेच्या संरचनेत त्यांचा मोलाच्या सहभाग होता.
‘ओम् प्रमाणपत्र’ चळवळ आणि हिंदूंना आवाहन
सर्व मंदिरांमध्ये भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो, त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य (भेसळयुक्त पदार्थ) असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर येतात. त्यामुळे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या गैरप्रकाराच्या विरोधात व्यापक स्वरूपात ‘प्रसाद शुद्धी चळवळ’ चालू करण्यात आली आहे. यापुढे प्रसाद विक्रेत्यांना ते वितरित करत असलेल्या प्रसादाच्या शुद्धतेचे प्रमाण देऊन ‘ओम् प्रमाणपत्र’ घ्यावे लागणार आहे.
‘ओम् प्रतिष्ठान’ या नावाने चालू झालेल्या नवीन उपक्रमाने हे प्रमाणपत्र सिद्ध केले असून त्यावर ‘क्यू.आर्. कोड’ असल्याने या प्रमाणपत्राची नक्कल करणे अशक्य आहे. आपण हा कोड ‘स्कॅन’ केल्यावर दुकानदाराचे नाव आणि पत्ता दिसतो. जर हे प्रमाणपत्र नकली असेल, तर तसे लगेच कळते आणि त्यावर कारवाई करता येते; म्हणून या प्रमाणपत्राचा प्रसार करणे आणि असे प्रमाणपत्र असलेल्या दुकानातूनच खरेदी करणे, हाच एकमेव उपाय आहे. ‘ओम् प्रमाणपत्र’ केवळ दुकानांसाठी नसून प्रत्येक प्रकारच्या व्यवसायासाठी आहे.
‘हे प्रमाणपत्र ‘हिंदूंपासून हिंदूंपर्यंत’, असे असून धर्मांधांच्या आर्थिक षड्यंत्रापासून हिंदूंना वाचवू शकेल. हे कार्य कठीण आहे; पण हिंदूंच्या श्रद्धेच्या रक्षणासाठी, मुलाबाळांचे भविष्य वाचवण्यासाठी जर हिंदू एकत्र येऊन कार्यरत झाले, तर हे अशक्य नाही. बांगलादेशी घुसखोर उद्या बहुसंख्य झाले आणि त्यांचा जन्मदर बघता येत्या १०-२० वर्षांतच ते बहुसंख्य होतील. त्यानंतर ते काय करतील, हे आपण सध्या बांगलादेशात जे घडत आहे, त्यातून बघतच आहोत; पण आज त्या गोष्टी केरळ, बंगालमध्येही राजरोस घडत आहेत. त्या उद्या इथेही घडतील आणि हे थांबवायचे असेल, आपल्या श्रद्धा भ्रष्ट होऊ द्यायच्या नसतील, तर यापुढे ‘ओम प्रमाणपत्र’ ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडूनच खरेदी करा.’
– श्री. रणजित सावरकर
इ. ‘मेल्ट्रॉन’च्या प्रकल्प विभागात काम करतांना नविन प्रकल्पाच्या तांत्रिक गोष्टींसह ‘आर्थिक अनुमान’ (फायनान्शियल फॉरकास्टिंग) करण्याचे त्यांचे दायित्व होते. हे दायित्व सांभाळतांनाच कामगार संघटनेत सचिव पदापासून कार्याध्यक्ष पदावर काम करतांना कामगारांच्या हितासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केल्या.
८. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करणार्यांच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया आणि त्यात येत असलेले यश
अ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावर अवमानकारक लिखाण केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, तसेच राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यात आली असून यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया झाली आहे. ‘लवकरच त्यांना न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी समन्स बजावले जाईल’, अशी चिन्हे आहेत.
आ. ‘मल्याळम् मनोरमा’ या प्रकाशकाने क्षमा मागितली !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चुकीच्या आणि अक्षम्य लिखाणाविषयी ‘द वीक’ या साप्ताहिकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. अखेरीस न्यायालयीन लढाईत ‘मल्याळम् मनोरमा’ या प्रकाशकास क्षमा मागावी लागली.
इ. ‘एबीपी माझा’ वाहिनीने मागितली क्षमा !
‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने २८ मे २०१८ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारा चर्चात्मक कार्यक्रम सादर केला. याविषयी वृत्तवाहिनीने रितसर ‘क्षमा मागावी’, याकरता श्री. रणजित सावरकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने त्यांच्या अंधेरी येथील कार्यालयात जाऊन निवेदन दिले. कुठलीही हिंसा किंवा तोडफोड न करता मुत्सद्देगिरीने वाहिनीस धडा शिकवण्यासाठी त्यांच्या विज्ञापनदात्यांनाच विनम्र आवाहन करून विज्ञापने थांबवली आणि या वृत्तवाहिनीच्या आर्थिक नाड्या आवळल्या. परिणामी वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येऊन क्षमा मागावी लागली.