MNS Chief Raj Thackeray : आतंकवाद्यांचा बंदोबस्त असा करा की, पुढील १० पिढ्यांचा थरकाप उडेल ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई – वर्ष १९७२ मध्ये म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळी इस्रायलच्या खेळाडूंवर पॅलेस्टिनी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. त्या वेळी इस्रायलने आतंकवादी आणि त्यांचा सूत्रधार यांना अशा पद्धतीने मारले होते की, पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. केंद्र सरकारने इस्रायलच्या पावलावर पाऊल ठेवून आतंकवादी आणि त्यांचे पाठीराखे यांना कायमचे संपवावे. आतंकवाद्यांचा बंदोबस्त असा करा की, पुढील १० पिढ्यांचा थरकाप उडेल, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला ‘एक्स’ खात्यावरून केले आहे.

या आवाहनामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, आतंकवाद्यांनी आक्रमण करतांना समोरच्यांचा धर्म विचारला. ही त्यांची मुजोरी आहे. मी अनेकदा भाषणात म्हणतो की ‘या देशात आमच्या हिंदूंवर जर कुणी याल, तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ.

या आतंकवाद्यांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असले, तरी त्यांना आपली शक्ती काय आहे ?, हे कळलेच पाहिजे. केंद्र सरकारकडून कठोर कारवाई होईल, याविषयी माझ्या मनात कुठलीच शंका नाही आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे रहातील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खात्रीने सरकारसमवेत असेल.