
मुंबई – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवली येथील ३, पुणे येथील २ आणि पनवेल येथील एका नागरिकाचा समावेश आहे. मृत नागरिकांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये हानीभरपाई देण्यात येणार आहे. अद्यापही महाराष्ट्रातील काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहेत. त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या आक्रमणातील घायाळ व्यक्तींना ५० सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येईल. जम्मू-काश्मीर येथे महाराष्ट्रात अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान जाणार आहे. त्याचा खर्च राज्यशासनाकडून करण्यात येईल.
मंत्रालयात साहाय्यासाठी अधिकार्यांची नियुक्ती !
पहलगाम येथील आक्रमणात महाराष्ट्रातील बाधित नागरिकांच्या साहाय्यासाठी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात २ अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे व्यवस्थापक विशेषकर सूर्यवंशी आणि कक्ष अधिकारी नितीन मसळे यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिक अथवा त्यांचे नातेवाईक यांच्या साहाय्याकरता मंत्रालय नियंत्रण कक्षात (०२२) २२०२७९९०/२२७९४२२९ हे दूरध्वनी, तर ९३२१५८७१४३ हा वॉट्सॲप क्रमांक, तसेच १०७० हा ‘टोल फ्री’ क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.