Kashmir Terror Attack : ‘कलमा’ म्हणण्यास सांगून हिंदूंना ठार मारले !

  • पहलगाममधील आक्रमणात २८ जण ठार, तर २० जण घायाळ

  • मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश

  • नौदल अधिकारी, गुप्तचर विभागाचा अधिकारी यांचाही मृतांमध्ये समावेश

  • केवळ पुरुषांनाच केले लक्ष्य

(‘कलमा’ म्हणजे अल्लाचा गौरव करणारी विधाने)

पहलगाम (जम्मू-काश्मीर) – येथे २२ एप्रिलला दुपारी झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण घायाळ झाल्याची अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आली. या पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी जिहादी आतंकवाद्यांनी त्यांची नावे विचारली, तर काहींचे कपडे उतरवून त्यांचा धर्म तपासून त्यांच्यावर गोळीबार केला. काहींना ठार मारण्यापूर्वी ‘कलमा’ म्हणण्यास सांगण्यात आले. उत्तरप्रदेशातील शुभम द्विवेदी यांना नाव विचारल्यानंतर डोक्यात गोळी मारून ठार करण्यात आले. मृतांमध्ये उत्तरप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यांतील पर्यटकांचा समावेश आहे. यासह नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातमधील प्रत्येकी एका पर्यटकाचा समावेश आहे. या आक्रमणात २ स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नौदल अधिकारी, तसेच बिहारमधील गुप्तचर विभागाचा अधिकारी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे आतंकवाद्यांनी या आक्रमणात केवळ पुरुषांनाच लक्ष्य केले. महिलांवर त्यांनी गोळीबार केला नाही.

पंतप्रधान मोदी विदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतले !

पंतप्रधान मोदी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी बैठक

या आक्रमणानंतर सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर असणारे पंतप्रधान मोदी दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. त्यांनी आल्यानंतर तातडीने वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. या वेळी गुप्तचर विभागांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आदी उपस्थित होते.

मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देणार

जम्मू-काश्मीर सरकारने या आक्रमणात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे.

यासह गंभीररित्या घायाळ झालेल्यांना २ लाख आणि किरकोळ घायाळांना १ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश

या आक्रमणात मृत झालेल्यांपैकी ६ जण महाराष्ट्रातील आहेत. यात डोंबिवलीचे ३, तर ठाणे, पुणे आणि पनवेल येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

मोदी यांच्यामुळे आमचा धर्म धोक्यात आहे ! – आतंकवादी

पुण्यातील पीडित पर्यटक आसावरी जगदाळे यांनी आक्रमणाची माहिती देतांना सांगितले की, गोळीबार झाल्यानंतर आम्ही भीतीने तंबूत शिरलो. आतंकवाद्यांनी माझ्या ५४ वर्षीय वडिलांना बाहेर बोलावून कुराणातील ओळी (कलमा) म्हणण्यास सांगितले. त्यांनी त्या न म्हटल्याने आतंकवाद्यांनी त्यांना डोक्यात, पाठीत आणि कानात गोळ्या घातल्या. तसेच ‘तुम्ही लोकांनी मोदीला डोक्यावर चढवून ठेवले आहे, त्याच्यामुळे आमचा धर्म धोक्यात आहे‘, असे ते म्हणाले. या आतंकवाद्यांचा वेश स्थानिक पोलिसांप्रमाणेच होता. ‘काश्मिरी आतंकवादी निरपराध महिला आणि मुले यांना ठार मारत नाहीत’, असा दावाही त्यांनी केला. त्यांनी अनेक पुरुषांना गोळ्या घातल्या. तिथे साहाय्यासाठी कुणीही नव्हते. पोलीस आणि सैनिक २० मिनिटांनी साहाय्यासाठी आले.

यासह आतंकवाद्यांनी काही हिंदूंना ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) असे म्हणण्यास सांगितले होते. ते न म्हटल्याने त्यांनी या हिंदूंना गोळ्या झाडून ठार मारले. काही जणांचे आधारकार्ड तपासून त्यांना ठार मारले, अशी माहितीही पीडितांनी दिली.

४ आतंकवाद्यांपैकी २ पाकिस्तानी !

या आतंकवादी आक्रमणात एकूण ४ आतंकवादी सहभागी होते आणि त्यांतील २ जण पाकिस्तानी होते. हे चौघे जण एकत्र असलेले छायाचित्र समोर आले आहे. या छायाचित्राच्या आधारे अन्वेषण यंत्रणा स्थानिकांकडून माहिती घेणार आहे.

भारत आतंकवादासमोर झुकणार नाही ! – केंद्रीय मंत्री अमित शहा

अमित शहा यांची घटनास्थळाला भेट

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणातील बळींना मी जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. भारत आतंकवादासमोर झुकणार नाही. या क्रूर आतंकवादी आक्रमणातील गुन्हेगारांना सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ते पहलगाम येथे या आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली वाहतांना बोलत होते. अमित शहा यांनी बैसरन या घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी येथे सुरक्षा अधिकार्‍यांकडून माहिती घेतली.

संपादकीय भूमिका

  • जिहादी आतंकवाद्यांनी यादव, मराठा, दलित आदी जाती न विचारता ‘हिंदु’ म्हणून या लोकांना ठार मारले, हे जातीजातींमध्ये भांडणार्‍या हिंदूंना लक्षात येणार आहे का ? या आतंकवादाच्या विरोधात ‘हिंदु’ म्हणून ते लढणार आहेत का ? केवळ आतंकवादच नाही, तर देशातील जिहादी मुसलमानांच्या विरोधात लढणार आहेत का ?
  • याविषयी समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, साम्यवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी मुसलमानप्रेमी निधर्मीवादी पक्ष तोंड बंद करून बसले आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेऊन यांना याविषयी जाब विचारला पाहिजे !